राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीमुळे यंदाच्या सणांवरही त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. ऐन सणावारांच्या तोंडावर राज्यात आलेल्या या संकटाचे गांभीर्य जाणून घेऊन अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यंदा दहीहंडीचे आयोजन रद्द केले आहे. यापूर्वी मनसेने डोंबिवली येथील दहीहंडी यंदा साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. तर आता भाजपा आमदार राम कदम यांनी यावर्षी दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापुर सांगली परिसरातील पुरग्रस्ताना सहायता करण्यासाठी ह्या वर्षी दही हंडी सोहळा रद्द करण्यात येत असून .. सर्व रक्कम पुरग्रस्ताना देण्यात येणार आहे . इतरही सर्व आयोजकनी सोहळा रद्द करावा अन्यथा साधेपनाने करत सर्व रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधि मधे द्यावी
— Ram kadam (@ramkadam) August 15, 2019
या कारणामुळे घेतला निर्णय
याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी यावर्षी दहीहंडी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती राम कदम यांनी दिली. पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच या पुरात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता त्या ठिकाणचे पाणी ओसरायला लागले असून मदत कार्याने जोर धरला आहे. त्यातच आता सर्वच स्तरातून मदतीचा हात पुढे करण्यात येत असून आता राम कदम यांनीदेखील दहीहंडीचा उत्सव रद्द करून त्यासाठी खर्च करण्यात येणारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
1/2 सर्व रक्कम पुरग्रस्ताना देण्यात येणार आहे . इतरही सर्व आयोजकनी सोहळा रद्द करावा अन्यथा साधेपनाने करत सर्व रक्कम पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधि मधे द्यावी . नम्र निवेदन !
आमदार राम कदम— Ram kadam (@ramkadam) August 15, 2019
दरम्यान, राम कदम यांनी इतर दहीहंडी आयोजकांनाही सोहळा रद्द करण्याचे आवाहन केले आहे. तसेच हा सोहळा साधेपणाने साजरा करत संपूर्ण निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात दहीहंडीचा सण साजरा होतो. जागोजागी मोठमोठ्या हंड्या उभारून द्या फोडण्यासाठी मोठ्या रकमेची बक्षिसे ठेवली जातात. मात्र यंदा साधेपणाने हा सण साजरा करण्याचे आयोजकांनी ठरवले आहे. तसेच काहींनी तर दहीहंडी उत्सवच रद्द केला आहे. त्यामध्ये आता आमदार राम कदम यांचाही समावेश झाला आहे.