घरमुंबईमुख्यमंत्र्यांनी वाझे-शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांचा खुलासा करावा, भाजपचे  प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

मुख्यमंत्र्यांनी वाझे-शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांचा खुलासा करावा, भाजपचे  प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

Subscribe

हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे. एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आले पाहिजे, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.

उद्योगपती मुकेश  अंबानींच्या घराबाहेर स्फोटके भरलेली गाडी उभी करून मनसुख हिरेनच्या हत्या कटात माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्माचा सहभाग असल्याचा आणि त्यासाठी सचिन वाझेने ४५ लाखांची सुपारी प्रदीप शर्माला दिल्याचा आरोप एनआयएने प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता या प्रकरणात गप्प न राहता वाझे आणि शर्मा यांच्यासोबतच्या संबंधांचा खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये  यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना  केली.

सचिन वाझे काही लादेन आहे का? असा सवाल करत वाझेची विधिमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिले पाहिजे. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने  प्रदीप शर्माला ४५ लाखांची सुपारी दिल्याची  आणि या कटाची आखणी पोलीस आयुक्तालयात झाल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुध्दा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे, असे उपाध्ये म्हणाले.

- Advertisement -

हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे. एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आले पाहिजे, अशी मागणी उपाध्ये यांनी केली. बाकी प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्राचा अपमान शोधणाऱ्या आणि अन्य नेत्यांवर सुपारीबाजीचा आरोप करणाऱ्या शिवसेनेच्या बोलघेवड्या नेत्यांनी शिवसेनेशी संबंध असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या कृतीने पोलीस खात्याचा आणि राज्याचा सन्मान वाढला का याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

याच वाझेचे निलंबन रद्द करून त्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे या गुन्हेगारांसोबतचे लागेबांधे संशयास्पद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समोर येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट करावी आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीची पाठराखण करून महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल  जाहीर दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी केली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -