मुंबईत ठरावीक वेळेत रेल्वे प्रवासाला परवानगी दिल्यानंतर विनातिकीट प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. यातच मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. १५ जून २०२० पासून अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली, तर १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांना ठरावीक वेळेत प्रवासाची परवानगी दिली. यादरम्यान २ लाख ३८ हजार विनातिकीट प्रवाशांवर रेल्वे विभागाने कारवाई केली आहे. यातून रेल्वेने तब्बल ७ कोटी ६१ लाखांचा दंड वसूल केला आहे.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने १५ जून २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत उपनगरी आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये सखोल व नियमित तिकीट तपासणी मोहीम चालविली. या तपासणी दरम्यान, विनातिकीट/अनियमित प्रवासाची २.३८ लाख प्रकरणांची नोंद करण्यात आली. त्यातून रेल्वे प्रशासनाने ७ कोटी ६१ लाखांचा दंड वसूल केला. यापैकी सुमारे १.७५ लाख प्रकरणे उपनगरी गाड्यांमध्ये आढळली आणि दंड म्हणून ५ कोटी १० लाखांचा दंड वसूल करण्यात आला. तर बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमधील ६३ हजार प्रकरणांमधून २ कोटी ५१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
यामध्ये बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहीमे दरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टमद्वारे व्युत्पन्न तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करण्याची प्रकरणे समोर आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. तर
गैरसोय टाळण्यासाठी आणि नियमानुसार प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वे केले आहे.