भिवंडी शहर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.५ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत आहे. वारंवार तक्रार करूनदेखील पाणीपुरवठा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवक असलेल्या मलिक मोमीन यांनी धरणे आंदोलनाची हाक दिली. यावेळी सोमवारी,१४ जानेवारी सत्ताधारी नगरसेवकांनी पाणीपुरवठा अधिकार्यांच्या विरोधात पालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला.
पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण
पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे धाव घेतली. त्यानंतर पाणीपुरवठा अधिकार्यांनीदेखील त्याकडे दुर्लक्ष केल्यानं धरणे आंदोलन करण्याचा निर्णय स्थानिक नगरसेवकांनी घेतला. वॉर्ड क्र.५ मधील इस्लामपुरा, कसाईवाडा, सुलेमान बिल्डिंग ,जैतुनपुरा, मुर्गी मोहल्ला परिसरातील नागरिक पाणीटंचाईमुळे हैराण झाले. त्यानंतर प्रशासनानं दाखवलेल्या उदासीनतेमुळे नगरसेवक धरणे आंदोलनाला बसले. यावेळी स्थानिक नगरसेवक मलिक मोमीन यांच्या नेतृत्वाखाली फराज बहाउद्दीन बाबा, नगरसेविका जरीना अन्सारी, हालीम अन्सारी, समाजसेवक तवाब अन्सारी, नगरसेवक नासिर खान, मिरझा जाकीर बेग, काँग्रेस उपाध्यक्ष तारिक गुड्डू, ब्लॉक अध्यक्ष शफिक बाबू आदींनी पालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला. त्यानंतर पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांनी नगरसेवकांची मनधरणी करून पाणीटंचाई दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.
वाचा – पाणीकपातीच्या मुद्यावर राजकारण तापणार