दादरच्या फुल मार्केटमध्ये झालेल्या गोळीबाराचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. दादर फुल मार्केटमध्ये वजन काटा पुरवण्याचे काम करणाऱ्या मनोज मौर्य यांची हत्या करण्यात आली होती. पूर्ववैमनस्यातून मनोज मौर्य यांची हत्या झाली असल्याचे उघड झाले आहे. मनोज यांची सुपारी दिल्लीतून देण्यात आली होती. मुंबई गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासामध्ये तिन्ही आरोपींना दिल्लीतून अटक केली आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने २४ ऑक्टोबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पूर्ववैमनस्यातून मनोज मौर्यची हत्या
जुन्या भांडणातून मनोज मौर्य यांची हत्या करण्यात आली होती. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राधाकृष्ण कुशवाह याने मनोज मौर्याला संपवण्यासाठी इतर दोन आरोपींना ५० हजारांची सुपारी दिली होती. दोन वर्षांपूर्वी मौर्या याची पत्नी मुख्य आरोपी राधाकृष्ण कुशवाह यांच्याकडे डिझेल बुस्टरच्या शोरूम मध्ये कामाला होती त्या दरम्यान काही तरी कारणावरून कुशवाह आणि मौर्या यांच्यात भांडण झाले होते. तोच राग मनात ठेवून मनोज मौर्या याचा खून करण्यात आला आहे.
४८ तासाच आरोपींना अटक
दादरच्या फुल मार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मनोज मौर्य यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरुन आलेल्या मारेकऱ्यांनी मौर्या यांच्यावर पाठीमागून गोळी झाडली यामध्ये जखमी झालेले मनोज यांचा जागीच मृत्यू झाला. गोळी झाडल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनोज यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांना घटनास्थळावरुन सीसीटीव्ही फूटेज मिळाले होते. या सीसीटीव्हीवरुन अवघ्या ४८ तासात त्यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपी राधाकृष्ण कुशवहा, राजेंद्र अहेरवार आणि हेमेंद्र कुशवाह या तीन आरोपींना दिल्लीतून अटक केली.