सकाळी जाणवणारा गारवा, ऊन पावसाचा खेळ तसेच ढगाळ वातावरण, वाढते प्रदूषण आणि धुळीमुळे मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून सर्दी खोकल्याने बेजार बेजार झाले आहेत. त्यामुळे सुखा खोकला, सर्दी, घसादुखीचे त्रास मुंबईकरांना जाणवत आहेत.
संसर्गजन्य आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ढगाळ वातावरण, पावसाची अनियमितता तसेच उष्णता यामुळे विषाणूंच्या पोषणासाठीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणामुळे सर्दी खोकल्यासह संसर्गजन्य आजारांचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे.
पालिका हॉस्पिटलमध्ये सध्या सर्दी खोकल्यासह संसर्ग जन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वातावरणाच्या अनियमित पणामुळे जंतू संसर्ग वाढला आहे. तसेच अशा वातावरणामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे. तसेच फटाक्यांमुळे धुराचा त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे. त्यामुळे, श्वसनाचा आजार असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी तसेच धुरामध्ये जाणे टाळावे. दीर्घकाळ सुरू राहणार्या या सर्दी खोकल्यासाठी वेळेवर उपचार घेणे, तपासण्या करून घेणेही गरजेचे असल्याचे केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी दिला आहे.
सध्या मुंबईत ऑक्टोबर हिट सुरू झाली आहे. पण, मध्येच पडत असलेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड बदल जाणवत आहे. तर, दुसरीकडे दिवाळीनिमित्ताने मुंबईत फटाके फोडण्याचा उत्साहही कायम आहे. त्यामुळे, प्रदूषणातही वाढ होतेय. या प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका हा लहान मुले, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या नागरिकांना होत असल्याचं ही डॉक्टर सांगतात. त्यामुळे अशा वातावरणात बाहेर पडताना तोंडाला मास्क लावून बाहेर पडण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. शिवाय, फटाके फोडत असलेल्या ठिकाणी जाणंही टाळलं पाहिजे असंही तज्ज्ञ सांगतात.