मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर काल ईडीने कारवाई केली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून केंद्रीय यंत्रणांनी आकसापोटी ही कारवाई केल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेते करत आहेत. याचदरम्यान, या प्रकरणात इतर काहीजणांबरोबर नंदकिशोर चतुर्वेदी नामक व्यक्तीचे नावही पुढे आले आहे. यामुळे ईडी त्याचा शोध घेत आहे. तर चतुर्वेदीचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अँटालिया स्कॉर्पियो प्रकरणातल्या मनसुख हिरेन सारखे तर त्याचे तर झाले नाही ना असा सवाल केला आहे.
यावेळी नितेश यांनी चतुर्वेदीचे या प्रकरणाशी असलेल्या कनेक्श्नवर सविस्तर माहितीच दिली आहे. ते म्हणाले की आदित्य ठाकरे हे २००५ पर्यंत कोमो इंटरप्रायझेस प्रा लि या कंपनीचे संचालक होते. नंतर चतुर्वेदी या कंपनीचे संचालक झाले. चतुर्वेदी जर हवाल्याचे व्यवहार करत पैशांचे गैरव्यवहार करत असेल तर महाराष्ट्राच्या एका मंत्र्याचे त्याच्याशी काय संबध आहेत. याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे. पण त्याचा मनसुख केला नाही ना याची भीती आहे. तसेच मी गेल्या वर्षापासून टि्वट करत आहे की नंदकिशोर चतुर्वेदीच्या माध्यमातून हवाला झाला आहे. असेही राणे यांनी म्हटले आहे.
नंदकिशोर चतुर्वेदी हा पाटणकर प्रकरणातील महत्वाचा दुवा आहे. ईडीने त्याला दुसऱ्यांदा समन बजावले आहे. तो आफ्रीकेत पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. पण आयकर आणि ईडी त्याचा कसून शोध घेत आहे.