गेल्या काही दिवसांत मुंबईतील आगीच्या (Mulund Fire) घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रत्येक महिन्यात आगीच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येत असते. मुंबई उपनगरातील मुलुंड भागात आज (ता. 25 एप्रिल) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. पाच मजली इमारतीला ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.
आज दुपारी पाच मजली इमारतीला आग लागल्यानंतर तत्काळ या आगीला विजविण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मुलुंड स्टेशनच्या जवळ असलेल्या धीरज अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावर आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच या घटनेत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. ज्यानंतर नागरिकांनी शांत राहण्याचे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले होते.
हेही वाचा – महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी; FIR दाखल न केल्याने दिल्ली पोलिसांना नोटीस
एक आठवड्यापूर्वी मुलुंडपासून जवळ असलेल्या ठाण्यामध्ये देखील भीषण आग लागली होती. 18 एप्रिलला रात्री ठाण्यातील ओरियन बिजनेस पार्क आणि सिने वंडर मॉलमध्ये ही आग लागली होती. त्या आगीवर तब्बल 10 तासानंतर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशमन दलाला यश आले होते. त्या आगीत देखील सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. मात्र, 20 पेक्षा अधिक दूचाकी, 4-5 चारचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या होत्या
आप्पा पाडा झोपडपट्टी आग
मार्च महिन्यात मालाड पूर्व येथील आप्पा पाडा झोपडपट्टीला देखील भीषण आग लागली होती. या आगीमध्ये हजारो कुटुंबे रस्त्यावर आली होती. ज्यानंतर या कुटुंबाना अनेक सामाजिक संघटनांनी पुन्हा नव्याने उभे राहण्यास मदत केली होती. वनक्षेत्राच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टीला नेहमीच आग लागण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे ही आग कोणीतरी मुद्दामहून लावत असल्याचा आरोप अनेकदा स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेला आहे.