कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पासाठी सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलनाचा आज दुसरा दिवस सुरू आहे. या प्रकल्पाला ग्रामस्थांकडून मोठ्या संख्येने विरोध केला जातोय. तसेच आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तयार करण्यात आलाय. दरम्यान, या सर्व प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली.
हा सर्व्हे थांबवा, आपण लोकांशी चर्चा करूया. सर्वांना एकत्र बसून विश्वासात घेतलं पाहीजे नाहीतर प्रोजेक्ट अडचणीत येईल, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. यावर उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून शरद पवारांना कळवतो, असं आश्वासन दिलं आहे. उदय सामंत आणि शरद पवार यांच्यात उद्या भेट होणार आहे. ही भेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी होणार असून या भेटीत बरसू प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.
तत्काळ सर्वेक्षण स्थगित करा, अजित पवारांची मागणी
रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.
…तर जालियनवाला हत्याकांड होईल
रिफायनरीच्या आंदोलकांचा विरोध केला जात आहे. हे अतिशय विकृत मनोवृत्तीचं सरकार आहे. दहशतवादी मनोवृत्तीचं सरकार आहे. बारसूच्या माळरानावर जमलेले हजारो लोक जर मागे हटले नाही तर आम्हाला भीती आहे की, ते या आंदोलकांवर गोळ्या झाडतील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूचं हत्याकांड होईल, अशी आम्हाला भीती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यात लक्ष घालत आहेत. कदाचित या सर्व प्रकरणावर मुंबईला त्यात लक्ष घालावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले होते.
हेही वाचा : पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून विरोध असेल तर… अजित पवारांचं मोठं वक्तव्य