घरमुंबईमुंबईचे अध्यक्षपद रिकामे ठेवण्यात जयंत पाटील यांचा स्वार्थ काय?

मुंबईचे अध्यक्षपद रिकामे ठेवण्यात जयंत पाटील यांचा स्वार्थ काय?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांत नव्या महिला प्रदेशाध्यक्षांची नेमणूक केली असताना मुंबईअध्यक्षपद मात्र गेल्या ४ दिवसांपासून रिकामंच आहे. त्यावर आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदाचा आणि प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा न देताच शिवसेनेत प्रवेश केला. वास्तविक आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तातडीने नव्या मुंबई शहर प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती होणं आवश्यक होतं. मात्र, सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाला ४ दिवस उलटल्यानंतरही मुंबईच्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यासाठी जयंत पाटील यांना वेळच मिळत नसल्याचं दिसत आहे! आणि त्यामुळेच मुंबई अध्यक्षाची नियुक्ती लवकर न करण्यामागे जयंत पाटील यांचा काय स्वार्थ आहे? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: नवाब मलिक यांना फोन करून ‘तुम्ही मुंबईची जबाबदारी सांभाळा’ असे सांगितले आणि त्याची माहिती त्यांनी जयंत पाटलांना दिली. मात्र तरीदेखील जयंत पाटलांनी पवारांनाच थोडं थांबायला सांगून ‘आपण स्वत: त्यात लक्ष घालून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊ’ असं सांगितल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला दिली. एकीकडे हे घडत असताना दुसरीकडे नवाब मलिक मुंबईचे अध्यक्ष होऊ नयेत यासाठी राष्ट्रवादीतील एक गट मुंबईतील प्रत्येक तालुकाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना फोन करून ही निवड कशी लांबवता येईल याची काळजी घेत असल्याचं देखील समजतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षावरून आता पक्षांतर्गत राजकारण रंग घेऊ लागल्याचं दिसून येत आहे.

नवाब मलिकांना जयंत पाटलांचाच विरोध!

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून मुंबईत मागील २० वर्षांत १२ वर्षांहून अधिक काळ सचिन अहिर मुंबई अध्यक्ष होते तर १५ वर्ष जयंत पाटील हे मुंबईचे पालकमंत्री होते. काही वर्ष मुंबईची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याही खांद्यावर होती. या तिन्ही नेत्यांनी मुंबईत पक्ष वाढणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आणि त्याचेच फलित म्हणून की काय, २० वर्षांनंतरदेखील मुंबईला पक्षातून कार्यक्षम अध्यक्ष मिळू शकलेला नाही. सचिन अहिर यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या तिसऱ्या टर्मवेळीच कार्याध्यधपदी असणाऱ्या नवाब मलिक यांना अध्यक्षपद देण्याचे खुद्द शरद पवारांनीच मान्य केले होते. मात्र, विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच मलिक यांना पद मिळू नये असा चंगच बांधला असल्याचे राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने ‘आपलं महानगर’ला सांगितले. आता राष्ट्रवादीच्या गोटातूनच मुंबईच्या अध्यक्षपदासाठी माजी खासदार संजय पाटील, विधानपरिषद सदस्य किरण पावसकर, विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण आणि खासदार माजिद मेमन यांची नावे पुढे केली जात आहेत. पण विशेष म्हणजे यापैकी संजय पाटील आणि किरण पावसकर यांनी आपण इच्छुक नसल्याचे वारंवार वरीष्ठ नेत्यांना सांगितल्याचं समजतं.

- Advertisement -

 


हेही वाचा – अखेर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचाही राजीनामा

नवाब मलिकही अध्यक्षपदासाठी इच्छुक नाही?

येत्या महिन्याभरात विधानसभेची आचारसंहिता लागू होईल. प्रत्यक्ष निवडणूक १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजपला अंगावर घेत प्रचाराची राळ उडवण्यासोबतच पक्ष एकसंध बांधून ठेवण्यासाठी फारच कमी वेळ उरला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही आणि शरद पवारांनी स्वत: सांगूनदेखील इतक्या कमी वेळात पक्षाची धुरा सांभाळण्यात नवाब मलिक इच्छुक नसल्याचे समजते. कारण जर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच नवाब मलिक मुंबईचे अध्यक्ष म्हणून नको असतील, तर तिकीट वाटपावेळी पुन्हा गटातटाचे राजकारण केले जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी भिती राष्ट्रवादीच्याच वरीष्ठ वर्तुळात व्यक्त होत आहे. एकीकडे जयंत पाटील यांनी पुण्याच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांची नियुक्ती चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही तासांतच केली. मात्र असं असताना मुंबईच्या अध्यक्ष निवडीला मात्र जयंत पाटील यांना वेळ मिळत नसल्यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

दरम्यान, एकीकडे ही सर्व चर्चा सुरू असतानाच नवाब मलिक यांनीच आपल्याला निवडणूक लढवायची असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षपद नको असल्याचं पक्षाला कळवलं असल्याचं सांगितलं आहे.

मला निवडणूक लढायची आहे. मी वेळ देऊ शकणार नाही. मला जबाबदारी नको असं मी पक्षाला कळवलं आहे. म्हणून ते पद रिक्त आहे. माझी त्या पदासाठी नेमणूक झालीच नव्हती.

नवाब मलिक, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

जयंत पाटलांचं भाजपशी ‘छुपं अंडरस्टँडिंग’?

दरम्यान, पिंपरी चिंचवड येथे बोलताना जयंत पाटील यांनी ‘मला ५ वर्षांपासून भाजपत येण्याची ऑफर आहे’, असे जाहीर केले होते. मुंबईचा अध्यक्ष न निवडण्यामागे त्यांची आणि भाजपची ही ‘छुपी अंडरस्टँडिंग’ आहे का? असा सवाल आता राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विचारला जात आहे. मुंबईत सध्या शिवसेना भाजपला अंगावर घेण्यास नवाब मलिक आणि किरण पावसकर हे दोघेच नेते शिल्लक असल्याचे बोलले जाते. निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद या सगळ्या युक्त्यांचा उपयोग करण्याचं कसब या दोघांकडेही आहे. शिवाय मागील ५ वर्षांत पावसकर किंवा मलिक यांच्यावर भाजपकडून कोणतेही आरोप झालेले नाहीत. त्यामुळे या दोघांपैकी एकाची निवड केल्यास ते या पदाला योग्यच ठरेल, असं बोललं जात आहे. मुंबईचं दीर्घकाळ नेतृत्व केलेले जयंत पाटील आणि सचिन अहिर या दोन्ही नेत्यांचे घनिष्ठ संबंध असल्यानेच अहिर राजीनामा न देता शिवसेनेत प्रवेश करतात आणि त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. हे गौडबंगाल काय? असा सवाल मुंबईतल्याच एका माजी नगरसेवकाने विचारला आहे. महिला प्रदेशाध्याप्रमाणेच मुंबईचा अध्यक्ष हेसुद्धा महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते रिकामे ठेवण्यात जयंत पाटील यांचा नक्की काय स्वार्थ आहे? असा सवाल आता विचारला जात आहे.


वाचा सविस्तर – अध्यक्षपदाचा राजीनामा न देता सचिन अहिर शिवसेनेत!

दरम्यान, या संदर्भात जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नव्या महिला प्रदेशाध्यक्षा स्वीकारणार पदभार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आज सोमवारी रुपाली चाकणकर पदभार स्वीकारणार आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा चित्रा वाघ यांनी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी सकाळीच जयंत पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या नावाची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली होती. सचिन अहिर यांच्या पाठोपाठ चित्रा वाघ देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.


हेही वाचा – कुणालाही पक्षात घेण्याचे सेना-भाजपचे धोरण हास्यास्पद-जयंत पाटील
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -