राज्यात ब्रेक दी चैन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, निर्बंधातून शिथिलता देताना सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवास करण्यास मूभा दिलेली नाही. यावरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. सर्व जणांच्या पाठीवर आपण “शिव पंख” लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.
संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी सरकारने निर्बंधांमध्ये केलेल्या शिथिलतेचं अभिनंदन करत लोकल प्रवासावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “सीएम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत बसला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी,” असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं.
सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते.आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण “शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही.मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 3, 2021
राज ठाकरेंनी केली होती लोकल प्रवासाची मागणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, असी मागणी केली होती. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. महाराष्ट्र सरकारनं निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीनं पावलं उचलावीत. सर्वसामान्य माणसानं आत्तापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत, तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहिलच, परंतु लोकल प्रवास तातडीनं सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं होतं.