मान्सूनला नुकतीच सुरूवात होऊन फक्त दोनच दिवस होत असून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना मागील काही दिवसांपासून मध्य रेल्वे वाहतूकीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सलग तिसऱ्या दिवशी ऐन गर्दीच्यावेळी कामाला निघालेल्या नोकरदारवर्गात संतापाचे वातावरण दिसत आहे. कारण आज परत एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण दिशेकडून मुंबईकडे येणारी मध्य रेल्वेची वाहतूक नेहमी प्रमाणे १५ ते २० मिनिटे उशिराने धिम्या गतीने सुरू आहे.
प्रवासी संघटनांचे रेल्वे व्यवस्थापकांना पत्र
१५ ते २० मिनिटे उशिराने धावत असलेल्या रेल्वेमुळे नियोजित वेळात पोहचणे शक्य नसल्याने प्रवासी म.रे ला हैराण झाले आहे. सतत होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर सर्वच प्रवासी संघटनांनी एकत्र येऊन रेल्वे व्यवस्थापकांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
८० लाख प्रवाशांची गैरसोय
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे वाहतूक कोणत्या न कोणत्या कारणांमुळे विलंबाने सुरू असल्याने प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत आहे. त्यामुळे नोकरदार वर्ग तसेच चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ८० लाख प्रवाशांना वेठीस धरू नये. यासोबतच लवकरात लवकर हा वाहतूकीचा त्रास दूर करण्याचे आवाहन प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनास केले आहे.
समस्येवर तोडगा काढून उपाययोजना करा
वारंवार खोळंबा होत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे तर मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात संतापही व्यक्त करत रेल्वे वाहतूकीच्या समस्येवर तोडगा काढून लवकर उपाययोजना करावी, अशी प्रवासी संघटनांनी रेल्वे व्यवस्थापकांकडे मागणी देखील केली आहे.