देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा फैलाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याला जबाबदार मुंबईची लोकल असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये लोकल या मिनी लॉकडाऊन आणि विकेंड लॉकडाऊनमध्ये बंद होणार का? अशी भीती निर्माण झाली आहे. पण आता मुंबईच्या या लाईफलाईनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन लोकल बंद करण्याबाबतचा विचार सुरू आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार बुडत होता म्हणून लोकल सुरू केली. मात्र आता गर्दीमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘मुंबईची लोकल सुरू करावी की बंद करावी? किंवा जसे मागच्या वर्षी वेळचे नियोजन करून दिले होते तशी सुरू ठेवावी, यावर विचार सुरू आहे. दरम्यान त्यावेळेस लोकल सुरू ठेवण्याबाबत रेल्वेशी आम्ही संपर्क केला. पण रेल्वे त्याला वारंवार नकार देत होती. मात्र चाकरमान्यांचा रोजगार बुडत होता म्हणून लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय. त्यामुळे रेल्वे संदर्भात निर्णय घेण्याचा आमचा नक्कीच विचार आहे. जर रेल्वे बंद नाही केली तर त्यावर निर्बंध लावण्याचा विचार सुरू आहे.’
बुधवारी दिवसभरात मुंबईत १० हजार ४२८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आणि २३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ८४ हजार ७६०वर पोहोचली. यापैकी आतापर्यंत ११ हजार ८५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल दिवसभरात ६ हजार ७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ३ लाख ८८ हजार ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ८१ हजार ८८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत मुंबईत ४४ लाख ५ हजार २३८ जणांचे कोरोना लसीकरण पार पडले आहे.
हेही वाचा – लोकल प्रवासासाठी जुनेच नियम लागू