मनमोहक देखाव्यांसाठी गणेश गल्लीचा गणपती ओळखला जातो. दरवर्षी हे मंडळ गणेशभक्तांसाठी नवनवे देखावे साकारते. देशातील विविध तीर्थक्षेत्राचे दर्शन या मंडळाकडून घडवण्यात येते. यंदाही ग्वाल्हेरच्या सूर्यमंदिरात गणेश गल्लीचा गणपती विराजमान होणार आहे. सुंदर अशा नयनरम्य देखाव्यात या राजाचे रुप भक्तांना पाहायला मिळणार आहे.लालबागचा सर्वात जुन्या असलेला हा गणपती उत्कृष्ट आयोजनामुळे ‘मुंबईचा राजा’ म्हणून ओळखला जातो. १९२८साली स्थापना झालेल्या लालबाग सार्वजनिक गणेशात्सव मंडळाचे यंदाचे हे ९१ वे वर्ष आहे.
भारतातील उत्तम, प्राचीन आणि भव्य मंदिरांच्या प्रतिकृती उभारणे हे या मंडळाचे वैशिष्ठ्य आहे. अनेकांना देशातील विविध ठिकाणी असलेल्या प्रसिद्ध तीर्थस्थळांना भेटी देणे शक्य होत नाहीत. अशा भक्तांसाठी प्रसिद्ध तीर्थस्थळांची प्रतिकृती हुबेहूब उभारण्याची किमया हे मंडळ साध्य करते. या ठिकाणी सुरूवातीची अनेक वर्षे सामाजिक देखावे उभारले जात होते. पण २००२ या अमृतमहोत्सवी वर्षी भव्य मीनाक्षी मंदिराची कल्पना समोर आली आणि तेव्हापासून हा पायंडाच पडला. भारतातील अनेक प्राचीन आणि भव्य मंदिरांच्या प्रतिकृती मंडळाने उभारल्या असून त्यांना लोकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे गणेश गल्ली म्हटले की, उंच मूर्ती आणि भव्य देखावा हे समीकरणच बनले.
असा असेल देखावाया देखाव्याची उंची ६५ फूट इतकी असणार आहे. तसेच ‘गंगा अवतरण’ असाही देखावा साकारण्याचा प्रयत्न मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. अमन विधाते हे कला दिग्दर्शक या मंदिराची प्रतिकृती उभारत आहेत. १०० कारागिरांची टीम ही गेल्या महिनाभरापासून या देखाव्यावर काम करत आहेत. फायबरमध्ये हे मंदिर तयार होणार असून पर्यावरणाचा समतोल ठेवण्याचा प्रयत्न देखील या मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. तर मूर्तिकार सतीश वळीवडेकर यांच्या हस्तकौशल्यातून अश्वारूढ मुंबईचा राजा साकारण्यात येणार आहे.
सूर्यमंदिराविषयी थोडक्यात१९२८ मध्ये जीडी बिर्ला या उद्योगपतींनी ग्वाल्हेरचे सूर्यमंदिर बांधले होते. हे मंदिर पाहण्यासाठी बरेच भक्त जात असतात. मात्र ज्या भक्तांना त्याठिकाणी जाता येत नाही अशा भक्तांकरता या सूर्यमंदिराची प्रतिकृतीतून या मंदिराचे सुंदर रुप पाहता येणार आहे.
२४ तास दर्शन सुरू राहणार
गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये दररोज किमान लाखभर भाविक दर्शन घेतात. त्यामुळे २४ तास दर्शन सुरूच असते. बाप्पांचा मुख्य गाभारा आणि मंदिरातील व्यवस्था पाहण्यासाठी निवडक कार्यकर्त्यांच्या टिम्स् मंडळाने तयार केल्या आहेत. दिवस रात्र ही मंडळी अगदी चोखपणे आपले काम पार पाडतात.
या मंडळींना मिळतो आरतीचा मान
गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात बाप्पाच्या आरतीचा मान खास मंडळींना दिला जातो. गणेशोत्सवाच्या काळात रात्रंदिवस राबणारे पोलीस, सफाई कर्मचारी, नर्सेस, दूध विक्रेते, फायरब्रिगेडचे कर्मचारी आणि सामाजिक संस्था यांना मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान दिला जातो. याचे नियोजन गणेशोत्सवाच्या आधीच करून त्या लोकांना त्याची सूचनाही देण्यात येते.
केरळवासीयांना मदतीचा हात
केरळवासीयांनाकरिता या मंडळांने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी फुल ना फुलाची पाकळी समजून आमच्या मंडळाकडून केरळ पूरग्रस्तांकरिता ५१ हजार रोख आणि पाचशे साड्या देणार आहे.किरण तावडे, लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष