मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये अग्रलेखांचे बादशहा अशी बिरुदावली असणारे ‘दैनिक नवाकाळ’चे संपादक तथा लेखक नीलकंठ (भाऊ) यशवंत खाडिलकर यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मंदाकिनी खाडिलकर आणि तीन मुली नवाकाळच्या कार्यकारी संपादिका जयश्री खाडिलकर-पांडे, संध्याकाळच्या कार्यकारी संपादिका रोहिणी खाडिलकर आणि वासंती खाडिलकर असा परिवार आहे. गिरगाव येथील ‘नवाकाळ’ कार्यालय येथे दुपारी १२ ते २ यादरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.
यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते मनोहर जोशी, संजय राऊत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ भाजप आमदार राम कदम यांच्यासह विविध पक्षातील त्यावेळी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे गिरगाव येथील राहत्या घरी अंत्यदर्शन घेतले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नीळकंठ खाडिलकर नवाकाळचे अनेक वर्ष संपादक होते. या काळात महत्त्वाच्या घडामोडींवर त्यांनी अग्रलेखांमधून भाष्य केले. खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या. तसेच वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू आणि विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे संपादक म्हणून खाडिलकर यांनी जवळपास २७ वर्षे काम केले. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होते. ते ‘ दैनिक संध्याकाळ’ या नावाचे सायंदैनिकही काढत असत. निळूभाऊ खाडिलकरांचं ‘हिंदुत्व’ हे पुस्तक समीक्षकांच्या आणि वाचकांच्या पसंतीस उतरले.
आपल्या तेज लेखणीने गेली ६ दशके सातत्याने अन्यायाविरोधात अग्रलेखांच्या माध्यमातून वाचा फोडणारे निळूभाऊ आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. अग्रलेख, प्रॅक्टिकल सोशॅलिझम आणि आपल्या भारधार वक्तृत्वाने निळूभाऊंनी दै.नवाकाळला एक झळाळी दिली. सामान्य जनतेचा तोफखाना अशी निळूभाऊंची ओळख होती.