कोरोनामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने गेल्या १५ मार्चपासून बंद ठेवण्यात आलेल्या राणीच्या बागेचे दरवाजे आता येत्या १५ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहेत. त्यामुळे आता मुंबईकरांना, पर्यटकांना राणी बागेतील पक्षी, प्राणी, पेंग्विन जवळून आणि निसर्गाचा सहवास पुन्हा लाभणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई महापालिकेने नागरिक, पर्यटक, प्राणी, पक्षी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १५ मार्च २०२० पासून राणीच्या बागेचे दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मदत झाली. मात्र मोठं मोठ्या कंपन्या, उद्योग यांच्यांप्रमाणेच राणी बागेच्या माध्यमातून दरमहा मिळणाऱ्या ४५ लाख रुपये इतक्या उत्पन्नाला पालिकेला मुकावे लागले.
गेल्या ११ महिन्यांत राणीची बाग कोरोनामुळे बंद ठेवण्यात आल्याने पालिकेचे जवळजवळ ५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. मात्र आता मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोना नियंत्रणात येत असल्याने राणी बाग प्रशासनाने पर्यटकांसाठी राणीची बाग पुन्हा एकदा खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यांनी परवानगी दिल्यास राणीच्या बागेचे दरवाजे सर्वांसाठी खुली होणार आहे.
पालिकेच्या तिजोरीतही राणी बागेच्या माध्यमातून दररोज दीड लाख रुपये जमा होण्यास पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. मात्र राणी बाग पर्यटकांसाठी खुली होण्यापूर्वी मुंबईकरांना, पर्यटकांना कोरोना विषयक योग्य ते नियम पाळणे गरजेचे आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. लॉकडाऊन आधी राणीबागेत दिवसाला सरासरी १५ ते २० हजार पर्यंटक भेट देत असतं. शनिवार, रविवारी या सुट्टीच्या दिवसांत हा आकडा ३० हजारापर्यंत जात असे.
हेही वाचा – मुंबईत बर्ड फ्ल्यूचा फैलाव? मृत कावळे, कबुतरांच्या रोज सरासरी १०३ तक्रारी!