रिपब्लिक टीव्ही चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअप चॅटमधून पुलवामा हल्ल्यासंदर्भात काही गंभीर माहिती उजेडात आल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला परखड शब्दांमध्ये सुनावले आहे. ‘भाजपमधल्या काही शेंबड्यांनी अशी मुक्ताफळं उधळली आहेत की अर्णबचे गुप्त चॅट उघड झाल्याबद्दल मुंबई पोलिसांवर कारवाई करा. अरे शेंबड्यांनो, मुळात तुमच्या अर्णबने देशाच्या सुरक्षेसंदर्भातही गुप्त माहिती उघड केली, त्यावर आधी बोला. मुंबई पोलिसांनी देशावर उपकारच केले आहेत. हे अस्तनीतले साप देशाच्या मुळावरच आले होते. त्यांचा फणा मुंबई पोलिसांनी ठेचला तर भाजपच्या शेंबड्यांना संताप का यावा?’ असा सवाल शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारला आहे.
‘तांडव’ सुरूच राहील!
‘तांडवचे निर्माते आणि दिग्दर्शकांविरोधात भाजपनं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले. पण जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱ्या गोस्वामीविरोधातही भाजप असे गुन्हे जागोजागी दाखल करणार असेल तर ते खरे मर्द. अर्णब गोस्वामीच्या देशद्रोहासंदर्भात देखील चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहीदांचा आत्मा शांत होईल. शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून तांडव करणारा मीडिया अर्णबच्या देशद्रोही कृत्यावर राष्ट्रीय बहस करायला तयार नाही. कारण त्यांचे स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान कुणाच्यातरी चरणावर गहाण ठेवला आहे. स्वातंत्र्याचा, राष्ट्रवादाचा लढा इतरांनी लढायचा, हे मात्र चौथा स्तंभ म्हणून मिरवणार! सगळाच धंदा झालाय. दोष तरी कुणाला द्यायचा? तांडव सुरू आहे, ते चालतच राहील!’ अशी परखड टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
‘तांडव’बाबत शिवसेनेची भूमिका काय?
तांडव वेबसीरिजबाबत देखील या अग्रलेखातून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ‘या सीरिजमध्ये हिंदू देवदेवतांविषयी आक्षेपार्ह विधाने असल्याचा बोभाटा भारतीय जनता पक्षाने केला. भगवान शंकर आणि नारदाच्या संवादातून श्रीरामाचा उल्लेख उपहासात्मक पद्धतीने झाल्याचे तांडव भाजपने सुरू केले. हिंदू देवदेवतांबाबत कोणत्याही प्रकारची अपमानास्पद विधाने शिवसेनेने कधी खपवून घेतली नाहीत. पण भारतीय जनता पक्षाने जे तांडव सुरू केले आहेत, त्यात प्रामाणिकपणाचा लवलेश नक्की किती, ही शंका आहेच’, असे अग्रलेखात म्हटले आहे.