गेले दीड वर्षे संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले होते. त्यामुळे सर्व अत्यावश्यक सेवा वगळता,अनेक व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयेसुद्धा बंद होऊन, ऑफलाइन शिक्षणपद्धती सुरु झाली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले होते.मात्र आता ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता सुरु झालेल्या शाळा पुन्हा बंद करण्यात येणार का? त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. अजूनही सर्व सेवा ठप्प झाल्या नाहीत तर मग शाळा बंद कशाला करता,अशा गंभीर तक्रारी पालकांनी केल्या आहेत.शिक्षण ही आपली प्राथमिक गरज आहे.याचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करावा अशी मागणी पालकांनी केली आहे. कारण ऑनलाइन शिक्षण पद्धतीत मुलांना विषयाचे आकलन होत नसल्यामुळे परिणामी मुलांच्या भविष्यात त्या गोष्टीचा त्यांनी त्रास होणार,अशी चिंतादेखील पालकांनी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपासून पुन्हा शाळा बंद होणार असल्याच्या माहिती सर्वत्र फिरत होती.मात्र, ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असून तुर्तास शाळा बंद करण्याचा निर्णय मी घेतला नाही, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा ठप्प करण्यात आल्या तरच शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पॅरेट्स असोसिएशन ऑफ मुंबई या संघटनेने केली आहे. लोकल सर्कल या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, ४९ टक्के पालक हे एखाद्या भागात ओमिक्रॉनचे एकाहून अधिक रुग्ण आढळले,असतील तर शाळा बंद कराव्यात, असे मत व्यक्त केले आहे. तर २१ टक्के पालकांमध्ये ओमिक्रॉनची भीती असून एखाद्या भागात एक जरी रुग्ण आढळून आल्यास, शाळा बंदच ठेवाव्यात,असे काही पालकांचे म्हणणे आहे.