आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना १२५ जागा जिंकून एकहाती सत्तास्थापन करेल, असा दावा परिवहनमंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी केला. या निवडणुकीत शिवसेना १५० जागा जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, आम्हाला किमान १२५ जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून आखली जात आहे. या दोन्ही नेत्यांना मुंबईची नस माहिती आहे. त्यामुळे अन्य पक्षांशी आघाडी, जागावाटप तसेच इतर रणनीतींबाबत अंतिम निर्णय उद्धव आणि आदित्य ठाकरेच घेतील, असेही परब यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेबद्दल मुंबईकरांना आपलेपणा वाटतो. मुंबई महापालिका हद्दीतील प्रत्येकाला आपल्या माता-भगिनी शिवसेनेमुळे सुरक्षित असल्याचा विश्वास आहे. आम्ही मुंबईत काही एकदाच निवडून आलेलो नाही. गेल्या २५ वर्षांपासून जनता आम्हाला पुन्हा पुन्हा निवडून देत आहे. याचा अर्थ त्यांना आम्ही आपले वाटतो. त्यामुळे अॅन्टी इन्कम्बन्सीचा मुद्दाच नाही. तो एकदाच निवडून आलेल्यांना भेडसावणारा प्रश्न असेलही. मात्र, आमचे तसे नाही, असेही परब म्हणाले.