बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आता राजकीय नेत्यांची वक्तव्यदेखील चर्चेत येत आहेत. या प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते, आमदार अतुल भातखळकर यांनी, आदित्य ठाकरे यांच्या त्या विधानाचा अर्थ लोकांनी कसा घ्यायचा, असा सवाल केला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर पत्रक शेअर करून आपले मत व्यक्त केले आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर
बॉलिवूडमधील अनेक कलाकार माझे मित्र आहेत व तो काही गुन्हा नाही. सुशांत सिंह प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. माझ्याविरुद्ध केवळ गलिच्छ राजकारण सुरू आहे. पण मी संयम बाळगलाय, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य यांच्या या वक्तव्यावरून भाजपच्या एका मंत्र्याने, ‘मी आजही संयम ठेऊन आहे’ अशा प्रकारचे उद्गार काढणे याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा? संयम सुटला तर काय करणार आहात हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळण्याची गरज आहे. आदित्य यांच्या एका सहकाऱ्यावर सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचे आरोप झाले होते, तशा पद्धतीचे काही करणे अपेक्षित आहे काय? लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण, असे भातखळकर यांनी विचारले आहे.
'मी आजही संयम ठेवलेला आहे'…
या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा अर्थ महाराष्ट्रातल्या जनतेने काय घ्यावा? ही धमकी आहे का? संयम सुटला तर काय कराल याचाही खुलासा केलात तर बरे होईल. pic.twitter.com/0nlhocBEXZ— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 5, 2020
पुढे भातखळकर म्हणाले की, मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणतात. परंतु ५० दिवसांनंतर साधा एफआयआर दाखल केलेला नाही, त्या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास कसा करत आहेत याचेही कायदेशीर ज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी द्यायला हवे. आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री आहेत. कुठल्याही फौजदारी प्रकरणाचा तपास गृहखात्याच्या अंतर्गत येतो, असे असताना या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत हे त्यांना कसे कळले? गेल्या काही दिवसांत ते मुंबईच्या पोलिस आयुक्तांना भेटले अशीही चर्चा आहे. या दरम्यान त्यांनी ही सखोल तपासाची माहिती आपणहून घेतली की पोलिस आयुक्तांनी त्यांना दिली याचाही त्यांनी खुलासा करावा. कुठल्याही फौजदारी प्रकरणाची माहिती आरोपपत्र दाखल होईपर्यंत तपास अधिकारी कोणालाही देऊ शकत नाहीत असे असताना पोलिस सखोल तपास करत आहेत हे आदित्य ठाकरे यांना कसे कळले? याचा त्यांनी तातडीने खुलासा न केल्यास या संदर्भात योग्य ती कायदेशीर पावलं आपण उचलू.
हेही वाचा –
Gujarat Covid Hospital Fire : पंतप्रधानांनी केली मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत जाहीर