शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीची कोठडी झाल्यापासून त्यांचे बंधू सुनील राऊत संजय राऊतांची खिंड लढवत आहेत. शिवसैनिकांचे अश्रू हे बंडखोरांना लागलेला तळतळाट आहे, असं सुनील राऊत म्हणाले. आज संजय राऊत यांना जे.जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते.
हेही वाचा – मला न बोलण्याचे आदेश, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा खुलासा
बंडखोर आमदारांनी शिवसेना पक्षाचीच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे. शिवसेनेला सोडून जाणाऱ्यांची काय अवस्था होते ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. शिवसैनिकांचे अश्रू हे बंडखोरांना लागलेला तळतळाट आहे. अवघ्या महिन्याभरातच ते अस्वस्थ झाल्याने मैत्री देनाचे औचित्य साधून एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत, असं सुनिल राऊत म्हणाले.
संजय राऊत तंदुरुस्त आणि मजबूत
संजय राऊत यांची तब्येत ठणठणीत आहे. ते तंदुरुस्त, मजबूत आणि आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचंही सुनील राऊत म्हणाले. संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे ते ईडीच्या करावाईला सामोरे जात आहेत, असंही सुनिल राऊत म्हणाले.
हेही वाचा – पाली, सरडे शोधत तेजस ठाकरे राजकारणात आले, त्यांचे तेवढे कर्तृत्व नाही; निलेश राणेंची जळजळीत टीका
संजय राऊत ३० ते ३२ वर्षांपासून शिवसेनेसाठी काम करत आहेत. त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रभाव आहे. बाळासाहेबांना जे अपेक्षित होतं तेच संजय राऊत करत आले आहेत. त्यामुळे ते कोणता भ्रष्टाचार करूच शकत नाहीत. त्यामुळे संजय राऊतांबाबत विरोधक आणि जनतेने निश्चिंत राहावं असंही सुनिल राऊत म्हणाले.
सध्या संजय राऊतांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या पत्नीलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. उद्या मलाही बोलवण्यात येईल. पण राऊत कुटुंब कधीच शिवसेनेला सोडणार नाही, असं सुनिल राऊत म्हणाले. ईडीला पुढे करून भाजपला काय साध्य करायचं आहे ते संपूर्ण राज्याला माहितेय, असाही टोला त्यांनी लगावला.