महिला व बाल विकास प्रकल्पांसाठी राज्यात अनेक वेगवेगळ्या उपाययोजना राबवणं महत्त्वाचं असून राज्य शासन विविध प्रकल्पांवर भर देत आहे. पण, या विभागाला आणखी बळकट करण्यासाठी अशासकीय सामाजिक संघटनांनी ही पुढाकार घेणं गरजेचं आहे. प्रशासन आणि एन.जी.ओ. नी समन्वयाने काम करुन अनेक प्रकल्प राबवावेत, असं आवाहन महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं आहे. दरम्यान, मंत्रालयात महिला व बालविकास, ग्रामीण विकास, महिलांचा कौशल्य विकास आदी क्षेत्रात राज्यभरात काम करणाऱ्या एनजीओनी ठाकूर यांच्यासमोर सादरीकरण केले. त्यावेळी ठाकूर बोलत होत्या.
माता आणि बालकांना पोषण आहार पुरवठा, महिलांना शिवणकला, हस्तकला आदी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याबाबत, महिला आणि बालकांची आरोग्य तपासणी, मानसिक आरोग्य, बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया, युवकांसाठी रोजगार निर्मिती, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नदी पुनरुज्जीवन आदी उपक्रमांचे सादरीकरण सामाजिक संस्थांनी केले. यावेळी महिला व बाल विकास मंत्री ठाकूर यांनी संस्थांच्या कामाची माहिती घेतली. तसचं, संस्थांनी आपल्या सूचना आणि प्रशासनाकडून आवश्यक सहकार्याविषयी माहिती सादर करावी, असेही आवाहन केले.
या सादरीकरणासाठी टाटा ट्रस्ट, युनायटेड नेशन्स फाउंडेशन, स्नेहा, द ब्रेकफास्ट रेव्होल्युशन, इंडियन लॉ सोसायटी, फाउंडेशन फॉर इकोलॉजिकल सोसायटी, युथ फॉर जॉब्ज, जेएसडब्ल्यू प्रोग्राम, रेमंड, सत्य साई चॅरिटेबल ट्रस्ट, व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन, कोरो आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.