राज्यातील धर्मादाय हॉस्पिटल्स, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था आणि इत्यादी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम धर्मादाय आयुक्तांकडून केले जाते. पण, गेल्या तीन महिन्यांपासून या आयुक्तालयाचे काम कासवगतीने सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे अनेक संस्थांच्या निवडणुका, पदाधिकारी बदलण्याची प्रक्रिया आणि अन्य प्रशासकीय कामे रखडलेली आहेत.
ग्राहकांना नाहक त्रास
मुंबईसह राज्यात ४३० धर्मादाय हॉस्पिटल्स आहेत. त्यासोबतच ८० हजारांपेक्षा जास्त संस्था आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचं काम तसंच त्यांच्या व्यवहारावर पडताळणी करण्याचं काम धर्मादाय आयुक्तांकडून करण्यात येते. तसेच अनेक हॉस्पिटल्सच्या आणि संस्थांच्या प्रशासकीय कामांसाठी आयुक्तांची परवानगी लागते. पण, हे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असल्यामुळे यातील बरीचशी कामे रखडलेली आहेत. त्यामुळे, अनेक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कामांसाठी फेऱ्या माराव्या लागतात. यातून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
धर्मादाय हॉस्पिटल्समधून येणाऱ्या तक्रारींचं निरासन करण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक पातळीवर एक समिती नेमली आहे. शिवाय, अधिकारीही अनेकदा हॉस्पिटल्समध्ये फेरफटका मारतात. त्यामुळे, ज्या तक्रारी दाखल होतात. त्यावर काम केलं जात आहे. पण, सध्या काम संथगतीने सुरू आहे.
– भारत व्यास, उपायुक्त, धर्मादाय
पद भरण्याची मागणी
गेल्या तीन महिन्यांपासून सह आयुक्त करमरकर हे आयुक्तांच्या अनुपस्थितीत कार्यभार सांभाळत आहेत. करमरकर हे जरी कार्यभार सांभाळत असले तरी अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या प्रशासकीय बैठकांमध्ये त्यांना सहभागी होता येत नाही. शिवाय, नियमाप्रमाणे निर्णय प्रक्रियेत ही त्यांचा सहभाग नसतो. त्यामुळे हे पद लवकरात लवकर भरण्यात यावं, अशी मागणी नागरिक करत आहेत.