घरठाणेगायमुख घाटात विचित्र अपघात; गाड्यांमध्ये अडकलेल्या तिघांची सुटका

गायमुख घाटात विचित्र अपघात; गाड्यांमध्ये अडकलेल्या तिघांची सुटका

Subscribe

* जखमींमध्ये एका १८ वर्षीय तरुणीचा समावेश, * पलटी झालेल्या टँकरमधून सांडलेल्या ऑईलमुळे वाहतुकीचे वाजले होते तीन-तेरा

घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात झालेल्या विचित्र अपघातात एकाच गाडीत तीन जण अडकून पडले होते. तर या अपघातात पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त कारमध्ये अडकून पडलेला कार चालक विनोद खरात (३०) यांच्यासह सृष्टी पाटील (१८) आणि पांडुरंग पाटील (४५) या तिघांची जवळपास काही तासांमध्ये सुटका करून त्यांना मीरा-भाईंदर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. ही घटना रविवारी रात्री १०.२० वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये एका कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून ऑईलचा टँकरही रस्त्याच्या मधोमध आडवा पडला होता. दरम्यान या अपघातात टँकरमधील ऑईल रस्त्यावर सांडून पसरल्याने अपघात झाल्यापासून सुमारे सोमवारी सायंकाळपर्यंत घोडबंदर रोडच्या वाहतुकीचे तीन-तेरा वाजल्याचे पाहण्यास मिळून आले आहे.

रविवारी रात्री १०.२० वाजताच्या सुमारास मे. पारस पेट्रो प्रा.लि.च्या मालकीचा ऑईलने भरलेला टँकर चालक घेऊन ठाण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी अनोळखी चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यामुळे घोडबंदरकडे जाणार्‍या एका ट्रकसह तीन चारचाकी वाहनांवर गायमुख घाटात घोडबंदरकडे जाणार्‍या वाहनावर जाऊन आदळला आणि पलटी झाला. या अपघातामध्ये एका कारमध्ये तिघे जण अडकून पडले होते. या अपघाताची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांसह वाहतूक पोलीस, ठाणे व मीरा-भाईंदर या दोन्ही महापालिकांचे अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

तसेच या अपघातात कोणी जखमी झाले आहे का? याची पाहणी केली त्यावेळी एका गाडीत तिघे अडकल्याचे समजताच त्यांच्या सुटकेसाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आणि त्यांची काही तासांत यशस्वीपणे सुटका केली. त्या तिघांना गंभीर दुखापत झाली असल्याने उपचारासाठी मीरा-भाईंदर येथील भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात तीन कार, एक ट्रक आणि टँकरचे नुकसान झाले आहे. यावेळी ठाणे अग्निशमन दलाचे दोन इमर्जंसी टेंडर, एक फायर वाहन, एक क्यूआरव्ही, मीरा भाईंदर अग्निशमन दलाचे एक फायर इंजिन, एक क्रेन, तीन हायड्रा, एक जेसीबी, तीन रुग्णवाहिकांना पाचारण केले होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

* अपघातामुळे लांबचलांब रांगा
या अपघाताचा फटका सकाळच्या सुमारास वाहन चालकांना चांगलाच बसल्याचा दिसून आला. रस्त्यावर सांडलेल्या ऑईलमुळे घोडबंदर रोडवर लांबचलांब रांगा लागल्याचे पाहण्यास मिळाले. यामुळे ठाण्याकडून घोडबंदर रोडवर जाण्यासाठी तासन्तास लागत होते. त्यातच सकाळच्या सुमारास रिक्षावाले येण्यास टाळा टाळ करत होते.

- Advertisement -

* नागरिकांनीही केली होती मोठी गर्दी
अपघाताची माहिती समजताच हळूहळू नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. ही संख्या वाढू लागल्याने मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी पाहण्यास मिळत होती. या गर्दीमुळे प्रशासनालाही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -