घरमुंबईठाण्यात पुन्हा खड्ड्याने घेतला माय-लेकीचा बळी 

ठाण्यात पुन्हा खड्ड्याने घेतला माय-लेकीचा बळी 

Subscribe

ठाण्यात राहणाऱ्या माय-लेकींचा भाईंदर पाड्याच्या रस्त्यावर ट्रेलरच्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

वाडा – भिवंडी रस्त्यावरील दुगाड फाटा येथे खड्ड्यामुळे एका २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा या खड्याने माय-लेकीचा बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. भाईंदर पाडा येथील रस्त्यावर ही घटना घडल्याचे समोर आले आहे. पत्नी आणि मुलीसह आपल्या घराकडे दुचाकीवर निघालेल्या परिवाराचा रस्त्यावरील खड्ड्याने घात केला आहे. खड्डा वाचविण्यासाठी केलेल्या खटाटोपात रस्त्यावर पडलेल्या मायलेकी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरखाली सापडल्याने मायलेकीचा दुर्दैवी अंत झाला आहे. याप्रकरणी कासारवडवली  पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आलेली असून अधिक तपास आणि अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान,  अपघात ट्रेलरच्या धडकेने कि खड्ड्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, खड्डा वाचाविण्याचा प्रयत्न करतानाच विश्वकर्मा परिवार खाली पडून ट्रेलरखाली आल्याचे स्थानिक प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले आहे.

गुरुवारी रात्री रस्त्यावरील खड्ड्याने मायलेकीच्या दुर्दैवी अपघाती निधनाने ठाण्यात रस्त्यांची चाळण झाल्याचा आणि वाहन चालविणाऱ्या दुचाकी चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरात राहणारे विश्वकर्मा परिवार हे गुरुवारी कामानिमित्त मिरारोड येथे गेले होते. रात्रीच्या परतीच्या प्रवासात दुचाकीवरून चंद्रावती विश्वकर्मा (३१) चिमुरडी प्रांजल (३) आणि दिलीप विश्वकर्मा (३३) हे दुचाकीवरून गुरुवारी रात्री ठाण्याकडे येत असताना रात्रीच्या ११ वाजण्याच्या सुमारास भाईंदर पाडा येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने दिलीप यांचा तोल गेला आणि तिघेही खाली पडले. मात्र, मागे बसलेली विश्वकर्मा यांची पत्नी चंद्रावती  आणि मुलगी प्रांजल हे गाडीपासून लांब पडले. दरम्यान, मागून येणारा ट्रेलर खाली मायलेकी आल्याने चंद्रावती फरफटत दूरवर गेली. अक्षरशः तिच्या शरीराचा खिमा झाला तर प्रांजलच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अपघात घडतच रस्त्यालगत असलेल्या प्रत्यक्षदर्शीनी मात्र त्वरित मदत कार्य करीत चिमुरडी प्रांजल हिला वेदांत रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तपासणीनंतर प्रांजलची परिस्थिती क्रिटीकल झाल्याने तिला मानपाडा येथील मेट्रो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत प्रांजलचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या अपघाती प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

घोडबंदर रोड ठरतो मृत्यूचा सापळा

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने ठाण्यात पुन्हा मायलेकीचा बळी गेल्याने एकाच खळबळ उडाली आहे. तर ठाण्यातील घोडबंदर रोड हा खड्ड्यामुळे आणि भरधाव अवजड वाहनाच्या वर्दळीमुळे मृत्यूचा सापळा झाला आहे. अनेक अपघाताची मालिकाच या परिसरात घडलेली आहे. रस्त्यावरील खड्डे, मेट्रोची कामे यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलर आणि अवजड वाहनाची भरमार घोडबंदर रोडवर रात्री मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघात हे नित्याचे झालेले आहेत. मात्र, गुरुवारी रात्रीच्या अपघाताने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या चालकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

तिच्या माहेरच्या गाठीभेटी अखेरच्या ठरल्या!

आपला पती आणि चिमुरडीला घेऊन आपल्या माहेरी मिरारोड येथे कुटुंबियांना भेटण्यासाठी गेली होती. दुचाकीवर गेलेले विश्वकर्मा कुटुंब रात्री १०-३० ते १०-४५ च्या दरम्यान मिरारोड वरून ठाण्याकडे निघाले आणि दोघा मायलेकीना भाईंदर पाड्यातच मृत्युने गाठले. घडलेल्या अपघातात चंद्रावती हिचा मृतदेह हा ट्रेलरने फरफटत नेला. मृतदेहाच्या चिंद्या उडाल्या होत्या. तर चिमुरडी अत्यवस्थ अवस्थेत होती. काळाने झडप घातली मात्र, स्थानिक रहिवाशी प्रत्यक्षदर्शी हे देवासारखे धावून आले. त्यांनी चिमुरडीला त्वरित रुग्णालयात नेले. मात्र, चिमुरडीचा काळ आणि वेळही आली होती. अन चिमुरडीने अखेरचा श्वास मेट्रो रुग्णालयात सोडला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -