पेण-: केंद्र आणि राज्य शासन झाडे लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु सध्या अनेक जगल भागात वणवे लावण्याचे प्रमाण वाढत असून, कडक ऊन्हामुळे जंगल काही क्षणात आगीच्या विळख्यात येत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी वणवे लागल्यामुळे कोट्यवधींची वनसंपत्ती जळून खाक झाली असून, कागदोपत्री नोंद घेणे यापलीकडे वन विभागाकडून फारशी दखल घेतली जात नाही. (Raigad district crores worth of forest resources were burnt) वन विभागाच्या या सुस्त कारभारामुळे वन्यप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत.
यंदाही जंगलात आगी किंवा वणवे लागण्याच्या घटना सुरू आहेत. आग लागू नये यासाठी कोणतेही ठोस उपाय योजले जात नसल्याने आगीची कारणे शोधून उपाययोजना राबविण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे. मानवी चुकांतून जंगलात आग लागत असल्यास अशा आगलाव्यांचा शोध घेणे, भविष्यात आगी लागू नयेत यासाठी उपाययोजना राबविणे महत्त्वाचे आहे. मात्र नेमके तेवढे सोडून बाकी सगळे करायचे, असा खाक्या वन विभागाचा असल्याचे बहुतांशी घटनांतून दिसते.
वन यंत्रणा वृक्ष लागवड आणि अन्य तांत्रिक कामात अडकून असल्याने आगी लावणार्यांचा शोध घेणे जवळपास बंद झाल्यात जमा आहे. जर जंगलात आग लावणार्यांना वन विभागाने चाप लावला तर अनेक ठिकाणी आग लावण्याचे प्रमाण कमी होईल. परंतु वन विभाग आग लावणार्यांचा शोध घेत नसल्याने आगलावे मोकाट आहेत.
- वन हद्दीत आग लागू शकेल अशा ज्वालाग्राही साधनांचा वापर करणे गुन्हा आहे. पण याकडे दुर्लक्ष होत असून, हा नियम न पाळण्याकडे सर्वांचाच कल आहे. काहीवेळेला विडी, सिगारेटच्या पेटत्या थोटकामुळे जंगलात आग लागते, तर काही विकृत मनोवृत्तीचे महाभाग जंगलात आग लावण्याचा आसुरी आनंद घेतात. त्यामुळे वन विभागाने वणव्याबाबत कठोर होण्याची गरज निर्माण झाली आहे.