जव्हार : आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी केंद्र शासनाने जन जाती आयोग स्थापन केला आहे. राज्यामध्ये देखील जन जाती आयोग स्थापन करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जव्हार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार संदीप धुर्वे आदी उपस्थित होते.
इंग्रजांनी आदिवासी समाजातील संस्कृती व परंपरा नष्ट करण्याचे काम केले. इंग्रजांच्या राजवटीविरोधात सशस्त्र लढा बिरसा मुंडा यांनी दिला. इंग्रजांनी जप्त केलेल्या आदिवासी समाजाच्या जमिनी परत आदिवासी समाजाला दिल्या.
इतिहासाने दखल न घेतलेल्या आदिवाशी समाजातील नायकांचा इतिहास पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. युती शासनाच्या काळामध्ये आदिवासी समाजातील मुलांना नामांकित शाळेमध्ये प्रवेश देण्यात आला होता. तसेच आश्रमशाळेचा दर्जा उंचावण्यात आला होता. पाच टक्के थेट पैसा पेसा गावांना मिळाला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले.