घरपालघरबोईसर : शहर एक, समस्या मात्र ढीगभर

बोईसर : शहर एक, समस्या मात्र ढीगभर

Subscribe

या समस्यांचे युद्ध पातळीवर निराकरण करण्यासाठी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वच्छ,सुशिक्षित,अभ्यासू,बोईसरच्या समस्यांची जाण असणारे व त्या सोडवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणारे आणि विकासाचा एजेंडा घेऊन चालणार्‍या उमेदवारांनाच निवडून देण्याबाबत मतदारांचा कल दिसून येत आहे.

डहाणू: औद्योगिक नगरी बोईसर ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच आणि १७ सदस्यांची निवडणूक १६ ऑक्टोबरला पार पडणार आहे.तारापूर औद्योगिक वसाहत,तारापूर अणूऊर्जा प्रकल्प आणि भाभा एटोमीक रिसर्च सारखे महत्वाचे प्रकल्प परिसरात असल्याने लोकसंख्या वाढून बोईसर शहराची वेगाने भरभराट झाली.मात्र वाढत्या नागरिकरणाचा अतिरिक्त भार आता बोईसर शहराला पेलवेनासा झाला असून शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला अनेक मर्यादा येत असल्याने तसेच विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.या समस्यांचे युद्ध पातळीवर निराकरण करण्यासाठी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वच्छ,सुशिक्षित,अभ्यासू,बोईसरच्या समस्यांची जाण असणारे व त्या सोडवण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणारे आणि विकासाचा एजेंडा घेऊन चालणार्‍या उमेदवारांनाच निवडून देण्याबाबत मतदारांचा कल दिसून येत आहे.

बोईसरमध्ये राहणार्‍या जवळपास १.५० लाख लोकसंख्येला तारापूर औद्योगिक वसाहतीकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.मात्र शहरातील सतत वाढती लोकसंख्या आणि झोपडपट्टी भागात हजारो बेकायदेशीर नळजोडण्या देण्यात आल्याने पाणीपुरवठा अनियमीत आणि कमी दाबाने होतो. ग्रामपंचायतीवर ५ कोटींपेक्षा अधिकची पाणीकर थकबाकी झाली असून प्रस्तावित गारगाव-खानीवडे पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर सुरू करणे गरजेचे आहे.
बोईसर-पालघर आणि बोईसर-तारापूर या प्रमुख रस्त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काँक्रीटीकरण करण्यात आले असले तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था मात्र कायम आहे.शिगाव फाटक रोड,वंजारवाडा,दांडीपाडा रस्ता,सिडको रस्त्यावरून जाणार्‍या वाहनचालकांना उखडलेले रस्ते आणि खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागते. त्याचप्रमाणे रस्त्याशेजारील गटारे ही उघडी असल्याने सफाई अभावी तुंबून त्यातील घाण सांडपाणी रस्त्यावर येते. मान्सूनपूर्व नालेसफाई ही व्यवस्थित केली जात नसल्याने पावसाळ्यात पाणी तुंबून नागरिकांना पुराचा फटका बसतो. बोईसर रेल्वे स्टेशन, नवापूर नाका आणि ओस्तवाल परीसरातील वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या पार्कींगचा प्रश्न दिवसेंदिवस आणखी जटील होत आहे.

- Advertisement -

अरुंद रस्ता, फेरीवाले, रस्त्यावरच उभी केलेली प्रवासी वाहने, बेशिस्त वाहनचालक यामुळे सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळेत मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातच रिक्षा, डमडम, इको या प्रवासी वाहनांना उभे राहण्यासाठी वाहनतळ नसल्याने ही वाहने स्टेशन परिसर,नवापूर नाका आणि तारापूर रोडवरील स्टँड वर आडवी-तिडवी उभी करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत असते.यासाठी बोईसर स्टेशन परिसराचा पुनर्विकास करणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे स्टेशनसमोरील बाजारपेठ अधिक सुटसुटीत करण्याबाबत योजना आखणे आवश्यक झाले आहे.

घनकचरा आणि कचराभूमी
बोईसर शहरातील नागरिकांना भेडसावणारी घनकचर्‍याची समस्या दिवसेंदिवस उग्र होताना दिसत आहे.रोज १८ ते २० टन जमा होणारा कचरा उचलून विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतीकडे आवश्यक सफाई कर्मचारी नसल्याने अनेक ठिकाणचा कचरा तीन-चार दिवस उचलला जात नसल्याने कचरा कुजून प्रचंड दुर्गंधी निर्माण होते.

- Advertisement -

वेगाने फोफावणारी अनधिकृत बांधकामे
तारापूर औद्योगिक वसाहत सुरू झाल्यानंतर बोईसर शहराची लोकसंख्या वेगाने वाढू लागली.कारखान्यांत काम करणार्‍या बहुतांशी हजारो परप्रांतीय कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना राहण्यासाठी शहरातील भूमाफीयांनी सरकारी,आदीवासी आणि वन जमिनी बळकावून त्यावर अनधिकृत झोपडपट्टया तयार करण्याचा सपाटा लावला.यामुळे भैय्यापाडा,दांडीपाडा,धनानी नगर,गणेश नगर,राणीशिगाव रोड,शिगाव रोड आणि लोखंडी पाडा सारख्या भागात हजारो अनधिकृत चाळी तयार झाल्या आहेत.या अनधिकृत बांधकामांना ग्रामपंचायतीकडून देखील त्वरेने ना हरकत दाखला आणि घरपट्टी देण्यात येत असल्याने तसेच महसूल विभागाकडून कारवाई होत नसल्याने शहराला बकाल रूप आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -