विरारः विरार पूर्व कारगिलनगर-मनवेल पाडा येथील रस्त्याची पुन्हा एकदा दुर्दशा झाली असतानाही वसई-विरार महापालिकेने अद्याप या रस्त्याकडे लक्ष दिलेले नाही. परिणामी खड्डेभरल्या रस्त्यातूनच नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. विरार स्थानक ते मनवेल पाडा व कारगिलनगर रिक्षा स्टँड ते कालीमाता मंदिरपर्यंतचा रस्ता नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. चिंचोळा रस्ता, मोठमोठे खड्डे आणि फेरिवाल्यांचे अतिक्रमण आणि सतत धावणार्या पाण्याच्या टँकरनी या रस्त्याची रस्त्याची दुर्दशा केलेली आहे. वसई-विरार महापालिका प्रशासन या भागाकडे लक्ष देत नसल्याने या समस्यांना तोंड देतच या भागातील नागरिकांना आयुष्य जगावे लागत आहे.
मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान कारगिल नगरमधील एका जलवाहिनीसाठी हा रस्ता खोदण्यात आला होता; त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या रस्त्याची तोंडदेखली डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर मात्र या रस्त्याचे काडीचेही काम झालेले नाही. यंदाच्या पावसाळ्यात तर हा संपूर्ण रस्ताच धुऊन गेला आहे. या रस्त्यावर आता केवळ मोठमोठे खड्डे उरलेले आहेत. वसई-विरार महापालिकेने मात्र अद्याप हे खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न केलेला नसल्याने परिसरातील नागरिकांनी नेहमीप्रमाणेच नाराजी व्यक्त केली आहे.