वीजपुरवठा खंडित झाल्याने दोन दिवसांपासून पाण्यासाठी वणवण करण्याऱ्या नागरिकांची तहान भगवण्याचे काम सफाळे येथील एकता मित्र मंडळाने करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात मोठमोठी वृक्ष उन्मळून अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. दुसरीकडे अनेक गावापाड्यासह जंगलपट्टी भागातील विजवाहिन्यांचे मोठे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाला. जिल्ह्यातील सफाळे भागातही विजवाहिन्या तुटण्यासह विजेचे पोल कोसळल्याने सोमवारपासून येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र दोन दिवस उलटूनही वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने येथील रहिवाशांचे पाण्याअभावी बेहद हाल झाले.
वादळामुळे वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांची मूलभूत गरज असणाऱ्या पाण्याचे हाल झालेले पाहवले नाही. लोकांची तात्पुरती का होईना ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही छोटासा हातभार लावला असून भविष्यात अशी समस्या उदभवू नये, यासाठी महावितरण सफाळे विभागाने भूमिगत विजवाहिण्याचा पर्याय निर्माण करावयास हवा.
– चंदूलाल घरत, सल्लागार, एकता मित्र मंडळ
अखेर सफाळे भागातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन निर्माण केलेल्या एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष राकेश घरत यांनी बुधवारी सायंकाळी स्वखर्चाने स्वतःचे जनरेटर लावून पाण्याचे मोटरपंप सुरू केले. मंडळाने दाखवलेल्या माणुसकीमुळे गुरुवारपासून सुमारे १०० ते १५० कुटुंबांना पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मागील दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने पिण्याच्या पाण्याचे खूपच झाले होते. मात्र एकता मित्र मंडळाने पुढाकार घेऊन आम्हा सर्वांची तहान भागवल्याने आम्ही त्यांचे ऋणी असून आभार व्यक्त करतो.
– कृतिका पाटील, रहिवाशी सफाळे
हेही वाचा –
Samsung Galaxyच्या ‘या’ डिवाईसवर मिळणार विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर