पालघर : केळवे माहीमच्या समुद्रात नाशिकहून सहलीसाठी आलेली चार मुले काही महिन्यांपूर्वी बुडून मृत्युमुखी पडली होती. तिथे उभारण्यात आलेल्या धूपप्रतिबंधक बंधार्याचा परिणाम झाला होता, असे सांगून ज्या ठिकाणी तो धूप प्रतिबंधक बंधारा आहे, त्याच्या मागच्या बाजूलाच भला मोठा पहाड निर्माण झाला आहे. भरतीच्या वेळी या पहाडामध्ये ओहोटीच्या वेळी भोवरा निर्माण झाल्यास जीवितहानी नाकारता येत नसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा बंधारा हटविण्यात येवून समुद्र मोकळा करावा, अशी मागणी केली आहे. केळवे समुद्राची धूप होवू नये म्हणून सुमारे 50 मीटर अंतरावर एक भला मोठा धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला आहे. हा बंधारा ओलांडून ज्यावेळी समुद्राच्या भरतीचे पाणी किनार्याला लागते, त्यावेळी भली मोठी पोकळी निर्माण होते आणि याच पोकळीमुळे संभाव्य अपघात नाकारता येत नसल्याचे दिसून येते. या बंधार्याबाबत स्थानिकांनी वारंवार आक्षेप घेतला आहे. मात्र, शास्त्रीय दृष्टिकोनातून या बंधार्याचा उपयोग समुद्र किनार्याची धूप थांबविण्यासाठी बांधण्यात आल्याचा दावा संबंधित विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, याचा परिणाम स्थानिक किंवा एखादा पर्यटक येथे निर्माण होणार्या भोवर्यात सापडण्याची शक्यता आहे.
भविष्यातील अपघात लक्षात घेतला तर संबंधित बंधारा हटविण्यात यावा आणि समुद्र मोकळा करण्यात यावा, असे म्हणणे आहे. मात्र, लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा धूप प्रतिबंधक बंधारा कसा हटवावा, असा प्रश्न आहे. या बंधार्याअभावी समुद्र किनार्याची हानी होत होती. अनेक ठिकाणी किनारा ढासळून गेला होता. सध्या या बंधार्यामुळे किनार्यावरील वाळू जशास तशी आहे. याचा विचार करून हा बंधारा बांधला गेला असावा असाही तर्क लढविला जात आहे.या बंधार्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडेही ग्रामपंचायत विभागाने तक्रारी केल्या असून सदर बंधारा त्वरित हटविण्यात यावा, अशी मागणी केली.