मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल, मंगळवारी जाहीर झाले. शिंदे-फडणवीस गटाला यश मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. त्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत उगाच आकडा लावून काय करणार?, असा टोला लगावला आहे.
राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल काल समोर आला. ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीसाठी फार महत्त्वाची होती. परंतु निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर राज्यातील जनतेने सर्वाधिक पाठिंबा भाजपला दिल्याचे दिसले. विदर्भ, कोकण, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात भाजपने सरशी केली आहे. तर बाळासाहेबांची शिवसेनेलाही जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे.
एक दिवस अगोदरच आम्हीच पहिल्या नंबर वर आहोत .असे म्हणणाऱ्या मंडळी नी राज्यातील त्यांचे सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करावी म्हणजे प्रश्न मिटला. जोरात खोटे बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होईल. ग्राम पंचायत निवडणुका चिन्हावर लढत नाहीत.तेव्हा उगाच आकडा लावून काय करणारं ?
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 21, 2022
या निडणुकीत भाजपा 2241, शिंदे गट 772, ठाकरे गट 668, राष्ट्रवादी 1512 आणि काँग्रेस 1038 ग्रामपंचायतींवर विजय मिळविला. तर, भाजप 1873, शिंदे गट 709, ठाकरे गट 571, राष्ट्रवादी 1007, काँग्रेस 657 सरपंच विजयी झाले. यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. ग्रामीण जनतेने पसंती दाखवली आहे. जे लोकं आमच्या सरकारला नावे ठेवत होते, त्यांना न्यायलयानेही सांगितले होते की, हे सरकार कायदेशीर आहे, आता महाराष्ट्राच्या जनतेनेही सांगितले की हेच कायदेशीर सरकार आहे. हीच जनता या सरकारच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.
यावर आज, गुरुवारी खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट केले आहे. एक दिवस अगोदरच आम्हीच पहिल्या नंबरवर आहोत. असे म्हणणाऱ्या मंडळींनी राज्यातील त्यांचे सरपंच आणि सदस्य यांची यादी जाहीर करावी म्हणजे प्रश्न मिटला. जोरात खोटे बोलल्याने काही काळ भ्रम निर्माण होईल. ग्रामपंचायत निवडणुका चिन्हावर लढल्या जात नाहीत. तेव्हा उगाच आकडा लावून काय करणार? असा सवाल त्यांनी केला आहे.