महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे शहराला गढूळ आणि अनियमित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या पाण्यामुळे एकूण शहराचेच आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी पुरवठ्यामधील समस्येचे निराकरण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी नगर परिषद कार्यालयात प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच नगराध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संयुक्त बैठक झाली. मात्र त्यानंतरही पाण्याची समस्या ‘जैसे थे’ असल्याने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबद्दलही नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. नागरिकांच्या संतापाला वाचा फोडण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष संतोष कदम आणि क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष कुलदीप जाधव यांनी प्राधिकरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
जगातील सर्वात महागडे पाणी बिल माथेरानकरांच्या माथी मारले जाते. मात्र तरी देखील प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे गढूळ आणि दूषित पाणी पुरवठा होत आहे. कोरोनामुळे एकीकडे जीव टांगणीला असताना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
-ऐश्वर्या शिंदे, गृहिणी
गेले काही दिवस माथेरानकर दूषित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही भागात नियमित पाणी पुरवठा केला जात नाही. या संदर्भात तक्रारी करून देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कान हलवत नसल्याने येत्या काही दिवसात क्षत्रिय मराठा समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.
-कुलदीप जाधव, माजी अध्यक्ष, क्षत्रिय मराठा समाज, माथेरान