तालुक्यातील दुर्गम भागातील भांदरे येथील नदीवरील पूल गेल्या काही वर्षांपासून कोसळलेल्या स्थितीत असून, कोकण पाटबंधारे काळ प्रकल्पाकडून दुर्लक्ष होत आहे. पन्हळघर बुद्रुक विद्यापीठ हद्दीतील दोन पूल तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी पूल कोसळले आहेत. साकव ना दुरुस्त झाले, ना कालव्यांची दुरुस्ती झालेली आहे. भांदरे चौकीजवळ नदीवरील पूल पावसाळ्यात कोसळला असून पलिकडे भातशेती असल्याने तळेगाव आदिवासीवाडी, हातकेळी, मुगवली, कविळवहाळ आणि भांदरे या गावांचा संपर्क तुटल्यासारखा आहे. ग्रामस्थांना जाण्या-येण्याकरिता फार मोठे अंतर कापावे लागते. शेतीकडे जाण्याचा मार्ग बंद झाला असल्याने शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागत आहेत.
काळ प्रकल्पातील नादुरुस्त कालवे, साकव, भांदरे नदीवरील कोसळलेल्या पुलाबाबत वारंवार संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. यावर पाटबंधारे खात्याने योग्य दखल न घेतल्यास भांदरे आणि शेजारी गावांतील नागरिक माणगाव जलसंपदा भवनावर मोर्चा आणण्याच्या तयारीत आहेत.
– संजय धसाडे, ग्रामस्थ, भांदरे
पूल तुटल्याची माहिती ग्रामस्थांसह सरपंचाने सर्व संबंधित विभागांना दिली असून, जवळ-जवळ वर्ष पूर्ण होत आले तरी काळ प्रकल्पाचे कोणीच अधिकारी घटनास्थळी आलेले नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.अतिवृष्टी झाल्यामुळे पूल कोसळला आणि पाणी योजनेच्या पाइपलाइनचेही मोठे नुकसान झाले आहे. काळ प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने नवीन पुलाची शासनाकडून मंजुरी घ्यावी आणि ग्रामस्थांची अडचण दूर करावी त्यासाठी आ. भरत गोगावले, जिल्हा परिषद सदस्य अमृता हरवंडकर यांनीही पत्र पाठविल्याची माहिती ग्रामस्थांनी ‘आपलं महानगर’ला दिली.