घररायगडमहाडमधील पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना ना पगार, ना मदत

महाडमधील पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना ना पगार, ना मदत

Subscribe

- तीन महिन्यांचा पगार कर्ज स्वरुपात, - एसटी महामंडळाच्या कामावर नाराजी

महाडमध्ये पूर आला आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. मात्र, पूरग्रस्त एसटी कामगारांना गेली दोन महिने ना पगार, ना पूरग्रस्त म्हणून मदत मिळाली. महामंडळाच्या या भूमिकेवर कामगारांनी संताप व्यक्त केला आहे.

संपूर्ण कोकणात महापुराने हाहा:कार माजवला. यामध्ये अनेकांचे संसार पुरात वाहून गेले. यामधून एसटी कर्मचारी देखील सुटले नाहीत. मात्र, महाराष्ट्र एसटी महामंडळाचा कोणताच पदाधिकारी अगर अधिकारी कर्मचार्‍यांचे दु:ख जाणून घेण्यास फिरकला नाही. एसटी आगारात कधी नव्हे ते पुराचे पाणी जवळपास सात ते आठ फुटापर्यंत आले. यामध्ये एसटीच्या ४१ गाड्या पूर्णपणे बुडाल्या. आगाराच्या बसेस आणि स्थावर मालमत्ता असे अंदाजे २ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या यातील बहुतांश बसेस रुळावर आल्या असल्या तरी कामगारांचे जनजीवन मात्र अद्याप सुरळीत झालेले नाही. गेली दोन महिने एसटी कामगारांना वेतनच मिळालेले नाही. यामुळे आगारातील जवळपास २९३ कामगार वेतनापासून वंचित आहेत.

- Advertisement -

गेली दोन वर्षे सातत्याने कोरोना महामारीमुळे एसटी सेवा बंद अवस्थेत आहे. संचारबंदी शिथिल केल्यानंतर काही अंशी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनातील नुकसान असतानाच अचानक नैसर्गिक आपत्तीमध्ये आगाराचे नुकसान झाले आहे. गेली महिनाभर कामगार आणि कर्मचारी वर्ग मेहनत घेत एसटी बसेस पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आपत्तीमध्ये, महामारीमध्ये, राजकीय कार्यक्रमांना, धार्मिक सोहळ्यांना अशा विविध प्रसंगी एसटी कामगार अहोरात्र मेहनत घेत आहे. बसेसची आणि निवासस्थानाची दुरवस्था असताना देखील एसटी कामगार आपली सेवा बजावत आहेत. एकीकडे महामंडळ आणि इतर शासकीय कर्मचार्‍यांचा पगार यातील तफावत असताना देखील काम करणारे एसटी कामगार गेली दोन महिन्यापासून वेतनापासून वंचित आहेत.

महाडमध्ये अनेक एसटी कामगार हे बाहेरून आलेले आहेत. यामुळे भाडे तत्वावर घरे घेवून याठिकाणी राहत आहेत. या महापुरात या कामगारांचे नुकसान झाले आहे. मात्र महामंडळाने कोणत्याच प्रकारची जीवनावश्यक साधनांची मदत दिली नाही. एकीकडे वेतन दिले गेले नाही तर दुसरीकडे मदत नसल्याने हे कामगार हतबल झाले आहेत. आगारातील प्रभारी आगार प्रमुख शिवाजी जाधव यांनी स्थानिक प्रशासन आणि काही सामाजिक संस्थांकडून कामगारांना मदतीचे संचय वाटप केले. यावर हे कर्मचारी उभे राहत असले तरी घरातील अन्नधान्य, कपडे, इतर सामानाचे नुकसान झालेले जवळपास १६१ कर्मचार्‍यांची यादी पाठवण्यात आली. त्यातील ३४ पंचनामे प्राप्त झाले असल्याचे सांगण्यात आले. शासनाने या कामगारांना तीन महिन्याचा पगार बिनव्याजी कर्ज स्वरूपात दिला आहे. तर काही कामगारांना अरुणोदय बँकेने २ हजार रुपयांची मदत केली असल्याचे आगार प्रमुख शिवाजी जाधव यांनी सांगितले.

- Advertisement -

गेली दोन महिने एसटी कामगार वेतनापासून वंचित आहेत. एकीकडे महापुरात झालेले नुकसान भरून कसे काढायचे असा प्रश्न डोळ्यासमोर असताना कामगार हतबल झाला आहे.
– दत्तराज पवार, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना

एस.टी. कामगार अहोरात्र काम करतात. जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे ते काम करत आहेत. मात्र गेली दोन महिने वेतन दिलेले नाही. कामगारांनी कसे जगायचे हा मोठा प्रश्नच आहे.
– शेखर सावंत, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना, महाड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -