आशियातील सर्व क्रिकेट संघासाठी मानाचा मानला जाणारा आशिया कप, २०१८ यावर्षी युएईमध्ये रंगणार आहे. याआधी ही स्पर्धा भारतात खेळवली जाईल अशी चर्चा होती. मात्र स्पर्धेत पाकिस्तानचा संघही या स्पर्धेत सहभाग घेत असल्यामुळे हे करणे अवघड होते. त्यामुळे अखेर सामने युएईत खेळवणार असल्याची माहीती क्रिकेट बोर्डाने दिली आहे. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेचे हे १४ वे वर्ष आहे. मागील वर्षी भारताने या स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात बांग्लादेशला तब्बल ८ विकेट्सने नमवत भारताने कप आपल्या नावे केला होता.
बीसीसीआय आणि एमिरेटस क्रिकेट बोर्डात झाला करार
स्पर्धा ही भारतात होणार असल्याची चर्चा होती मात्र पाकिस्तानी क्रिकेट संघाचा स्पर्धेत सहभाग असून त्यामुळे पाकिस्तानच्या संघाला भारतात खेळवताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचे निश्चित झाले असून याबाबतचे सर्व अधिकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एमिरेटस क्रिकेट बोर्डाच्या स्वाधिन केले आहेत.
भारताने आशिया कपमध्ये खेळू नये – वीरेंद्र सेहवाग
आशिया कप २०१८ मध्ये भारताच्या १८ सप्टेंबर आणि १९ सप्टेंबर अशा दोन्ही दिवशी सलग मॅचेस ठेवण्यात आल्या आहेत. अशा विचित्र वेळापत्रकामुळे ‘भारताने या कपमध्ये खेळू नये’ असा सल्ला भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने दिला आहे. सेहवागने हे विधान ‘इंडिया टीव्ही’शी बोलताना केले आहे. दरवर्षी होणारा आशिया कप यावर्षी यूएई येथे होणार असून यात अफगाणिस्तान, बांग्लादेश, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे पाच संघ सहभाग घेणार आहेत. ज्यात ‘अ’ गटात भारत आणि पाकिस्तान हे संघ असून ‘ब’ गटात बांग्लादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.