प्रो-कबड्डीने खेळाला नवसंजीवनी मिळवून दिली का?
भावसार : होय. प्रो-कबड्डी स्पर्धा इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यास पात्र आहे. मागील ५० वर्षे कबड्डीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ती प्रो कबड्डीने मिळवून दिली. कबड्डी खेळणार्या खेळाडूंना आर्थिक फायदा झाला. खेळाडूंना मान-सन्मान मिळू लागला. अनेक वर्ष कबड्डी स्पर्धा एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित होती. प्रो कबड्डी स्पर्धा सुरू झाल्यानंतर सर्वच वर्गाचा पाठिंबा मिळत आहे. कॉर्पोरेटने भाग घेतला आहे. ११९० सालापासून आतापर्यंत ६ आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या. भारताच्या खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवून दिले. पण लोकप्रियता लाभली नाही. ती मिळवून देण्याचे काम प्रो कबड्डीने केले आहे.
प्रो कबड्डी लीगमुळे पूर्वी स्थानिक स्पर्धांमध्ये खेळणारे खेळाडू आता मैदानात उतरत नाही का ?
भावसार : असे काही नाही आहे. हा लोकांचा चुकीचा विचार आहे. प्रो कबड्डीमध्ये सहभागी होणारे खेळाडू स्थानिक खेळामध्येही सहभागी होतात. असे अनेक खेळाडू आहेत जे आज त्याच्या संघासाठी स्थानिक कबड्डी स्पर्धेसाठी खेळतात. प्रो लीगमुळे ३ महिन्याचे अंतर पडते. फिटनेस दाखवावा लागते. वेळ द्यावा लागतो. दुखापतीपासून लांब राहावे लागते. यामुळे स्थानिक स्पर्धेत खेळायचे प्रमाण कमी झाले असेल, पण खेळणे पूर्णपणे बंद केले हे बोलणे चुकीचे ठरेल.
प्रो कबड्डीमुळे दुखापती वाढू शकतात का ?
भावसार : हो वाढू शकतात. कारण प्रो कबड्डी स्पर्धा मॅटवर खेळवल्या जातात. पण जिथे हे खेळाडू सर्व करतात तिथे मॅट नसल्यामुळे मातीत सराव करावा लागतो. ३ महिने प्रो कबड्डीची स्पर्धा रंगते. यामध्ये छोट्या दुखापतींकडे खेळाडू दुर्लक्ष करतात. हे एक कारण आहे ज्यामुळे दुखापती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात.
महाराष्ट्राची कबड्डी आता कोणत्या स्तरावर आहे ?
भावसार : २०१८ ला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिनियर पुरुष गटाने विजेतेपद पटकावले होते. महाराष्ट्राची कबड्डी मागे पडली असे काही नाही आहे. महाराष्ट्राचे २५ खेळाडू प्रो कबड्डीमध्ये खेळतात. खेळाडूंवर करोडोंची बोली लागते. महाराष्ट्राचा रिशांक देवाडिया, गिरीश इरनाक हे भारतीय कबड्डी संघासाठी खेळतात. इंडोनेशियामधील जकार्ता येथे होणार्या एशियन्स गेम्समध्ये देखील ते दोघे खेळणार आहेत. महाराष्ट्रातील १९९० नंतर तब्ब्ल २७ वर्षांनंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे.
इतर राज्यांचे खेळाडू महाराष्ट्राच्या खेळाडूंपेक्षा सरस आहेत का ?
भावसार : आजची परिस्थिती विचारात घेतली तर असे काही नाही. आपले खेळाडू त्यांच्या तोडीचे आहेत. कोणत्याही बाबतीत आपण पाठी नाही आहोत.
कबड्डीचा आंतरराष्ट्रीय प्रवास योग्य दिशेने सुरू आहे का ?
भावसार : भारतीय कबड्डीचा आंतरराष्ट्रीय प्रवास योग्य दिशेने सुरू आहे . पहिल्यांदा फक्त कबड्डी आशिया खंडात खेळली जायची. पण आता दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप या खंडात कबड्डीचा प्रसार झाला आहे. तिथले देश ही स्पर्धेत सहभागी होत असतात.