टी २० विश्वचषकात भारतीय संघाचा पुढील सामना रविवारी न्यूझीलंड सोबत होणार आहे. भारताला आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. रविवारच्या सामन्यात न्यूझीलंड आणि भारत दोन्हीही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असतील. न्यूझीलंडचाही आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरूध्द पराभव झाला आहे. अशातच दोन्हीही संघासाठी हा सामना “करो या मरो” असा असणार आहे. अशा या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी संघात २ बदल करण्याचा सल्ला दिला आहे .
गावसकर यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले, “अष्टपैलू हार्दीक पंड्या गोलंदाजी करत नाही तर त्याच्या जागेवर ईशान किशनला संधी द्यायला हवी. ईशान किशन सध्या चांगलाच फॉर्म मध्ये आहे”, सोबतच गावसकरांनी शार्दुल ठाकूरचाही पहिल्या ११ खेळाडू मध्ये समावेश करायला हवा असे सांगितले.
हार्दीक पंड्या गोलंदाजी करत नाही आणि पाकिस्तान सोबतच्या सामन्यादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे, आणि ईशान किशन सध्या चांगल्या लयनुसार खेळत आहे त्यामुळे मी त्याला आजच्या स्थितीला पंड्या पेक्षा पुढे पाहतो. किंवा कदाचित आपण भुवनेश्वर कुमारच्या जागेवर शार्दुल ठाकुरचा देखील विचार करू शकतो. सोबतच आपण जास्त संघात बदल केला तर प्रतिस्पर्धी संघाला वाटेल की आपण त्यांना घाबरतोय, म्हणून जास्त बदल न करता मोजकाच बदल पण प्रभावशील असावा असे मत गावसकरांनी मांडले.
पाकिस्तानने भारताला १५१ धावांवर रोखले होते
भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने १५१ धावांवर रोखले होते. त्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानच्या फलंदाजांवर प्रभाव टाकण्यात अपयश आले होते. भारतीय संघाच्या गोलंदाजांना एकही बळी घेता आला नव्हता, पाकिस्तानने १० गडी राखून सामन्यावर विजय मिळवला होता.
आयपीएल २०२१ मध्ये पण पंड्याची कामगिरी निराशाजनक
हार्दीक पांड्या मागील कित्येक महिन्यापासून गोलंदाजी करत नाही, नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या १४ व्या हंगामातील दुसऱ्या सत्रात देखील पांड्याची फलंदाजी निराशाजनक पहायला मिळाली. पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात संघाला मोठ्या फटकरांची गरज असताना पांड्या फक्त ११ धावा करून बाद झाला होता.
ईशान किशन राखीव सलामीवीर म्हणून भारतीय संघाचा हिस्सा आहे
लक्षणीय बाब म्हणजे बुधवारी पंड्या सरावादरम्यान गोलंदाजी करताना पहायला मिळाला होता. त्यामुळे न्यूझीलंड विरूध्दच्या सामन्यात हार्दिकचा पहिल्या ११ खेळाडूंमध्ये समावेश केला तर तो गोलंदाजी करेल का अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. तर दुसरीकडे ईशांत किशनचा राखीव सलामीवीर म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे, तर भुवनेश्वर कुमार देखील सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे, तोही पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यात काही प्रभावशील करू शकला नाही.