टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या जागेवर कर्णधार झालेल्या रोहित शर्माच्या बाबतीत सतत काहीना काही घडामोडी समोर येत आहेत. अशातच भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि सध्याचे खासदार गौतम गंभीर यांनी रोहित शर्माला व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये कर्णधार केल्यावरून मोठे वक्तव्य केले आहे. गंभीर यांच्या म्हणण्यानुसार भारतीय संघ व्हाइट बॉल क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये सध्या सुरक्षित हातात आहे. गौतम गंभीर यांनी म्हंटले की, “मला वाटते की भारतीय क्रिकेटसाठी चांगले आहे की आता आपल्याकडे दोन कर्णधार आहेत. एक रेड बॉलसाठी आणि दुसरा व्हाइट बॉलसाठी. रोहित शर्मा कर्णधार म्हणून भारतीय संघासाठी शानदार कामगिरी करेल. व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये आता भारतीय संघ सुरक्षित हातात आहे”.
गंभीर यांनी आणखी म्हंटले की, रोहित शर्माने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. म्हणजेच तो दुसऱ्या कर्णधारांपेक्षा काहीतरी योग्य करत असेलच. रोहित शर्माचा शांत स्वभाव देखील भारतीय संघासाठी खूप फायदेमंद असेल.
काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी घोषणा झाली आहे. या सोबतच निवड समितीने एकदिवसीय संघाचा कर्णधार देखील बदलण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीचा एकदिवसीय कर्णधारपदावरून पत्ता कट झाला आणि रोहित शर्माची कर्णधारपदी वर्णी लागली.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील रोहित शर्माच्या शानदार विक्रमाचा उल्लेख केला. गांगुलींनी सांगितले, रोहितने आशियाई चषकात भारतीय संघाला विजय मिळवला आहे. तेव्हा विराट कोहलीदेखील संघात नव्हता. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. आम्हाला आशा आहे की रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ अधिक चांगली कामगिरी करेल.
हे ही वाचा : http://Ashes Series 2021 : ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; एडिलेड पिंक बॉल सामन्यातून जोश हेजलवुड बाहेर