भारतीय संघाला नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने हा सामना ८ विकेट राखून जिंकत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. या सामन्यापूर्वी सरावासाठी पुरेशी संधी न मिळणे भारतीय संघाला महागात पडल्याचे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. तसेच भारतीय खेळाडूंना आता तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर सर्व खेळाडू १४ जुलैला डरहम येथे पुन्हा एकत्र जमणार असून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीला लागणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होईल. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीला सुरुवात करण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना २० दिवसांची विश्रांती देण्यात आल्याचे वेंगसरकरांना आश्चर्य वाटले.
सातत्याने क्रिकेट खेळणे गरजेचे
इंग्लंड दौऱ्याच्या कार्यक्रमाचे कसे वर्णन करावे हेच मला कळत नाही. खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांना बाहेर फिरण्याची परवानगी आहे. मात्र, ते जाणार कुठे आणि पुन्हा येऊन कसोटी सामने खेळणार कसे? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर खेळाडूंना एका आठवड्याची विश्रांती पुरेशी होती. तुम्ही सातत्याने क्रिकेट खेळत राहणे गरजेचे असते. त्यामुळे इंग्लंड मालिकेपूर्वी त्यांना तीन आठवड्यांची विश्रांती दिल्याचे मला आश्चर्य वाटत आहे, असे वेंगसरकर म्हणाले.
पुरेसा सराव न मिळणे महागात पडले
तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी पुरेसा सराव न करणे भारतीय संघाला महागात पडल्याचे वेंगसरकर यांना वाटते. मागील दोन वर्षांत कसोटी क्रिकेट पाहताना खूप मजा आली. भारताने या काळात खूपच चांगली कामगिरी केली. परंतु, अंतिम सामन्यापूर्वी पुरेसा सराव न मिळणे त्यांना महागात पडले. त्यांनी इतक्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी एकही सराव सामना खेळला नाही. याऊलट न्यूझीलंडचे खेळाडू मॅच-फिट होत, असे वेंगसरकर यांनी सांगितले.