शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला असून तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच श्रीलंकेच्या दलात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रांट फ्लॉवर आणि डेटा अॅनालिस्ट जी. टी. निरोशन यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका काही दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आता १३ ऐवजी १८ जुलैला खेळला जाणार आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी दिली.
सर्व सामने कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये
यजमानांच्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारत-श्रीलंका मालिकेला आता १८ जुलैपासून सुरुवात होईल, असे जय शाह म्हणाले. एकदिवसीय मालिकेचे सामने आता १८, २० आणि २३ जुलैला, तर टी-२० मालिकेचे सामने २५, २७ आणि २९ जुलैला खेळले जाणार आहेत. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेचे सर्व सामने हे कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडतील.
श्रीलंकन संघात कोरोनाचा वाढता संसर्ग
श्रीलंकेचा संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. तेथून हा संघ मंगळवारी मायदेशी परतला. त्यानंतर गुरुवारी ग्रांट फ्लॉवर यांचा, तर शुक्रवारी डेटा अॅनालिस्ट जी. टी. निरोशन यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यापाठोपाठ शनिवारी आणखी एका श्रीलंकन खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. श्रीलंकन संघात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असल्यानेच सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.