कसोटी आणि टी-२० मालिका विजयानंतर विराट कोहलीचा भारतीय संघ एकदिवसीय मालिकेतही दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत सध्या इंग्लंड अव्वल, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या अव्वल दोन संघांमधील तीन सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेवर चाहत्यांचे लक्ष असणार आहे. कसोटी आणि टी-२० मालिकेची सुरुवात भारताने पराभवाने केली होती. एकदिवसीय मालिकेत मात्र विजयी सुरुवात करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
चांगल्या कामगिरीचा धवनचा प्रयत्न
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. धवन टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात केवळ ४ धावा करून बाद झाला. त्यामुळे त्याला उर्वरित चार सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले. मात्र, एकदिवसीय मालिकेत धवनच रोहित शर्माच्या साथीने भारताच्या डावाची सुरुवात करणार असल्याचे कर्णधार कोहलीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवण्याचा धवनचा प्रयत्न असेल.
भुवनेश्वरचे एकदिवसीय संघात पुनरागमन
तसेच मधल्या फळीतील स्थानासाठी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या मुंबईकरांमध्ये स्पर्धा आहे. मात्र, सूर्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकेल. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारचे एकदिवसीय संघात पुनरागमन होण्याची शक्यता असून तो शार्दूल ठाकूर आणि नटराजन यांच्यासह वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल.