भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभूत केले. लॉर्ड्सवर झालेला हा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला. भारतीय संघ या सामन्यात पहिल्या डावात पिछाडीवर होता. तसेच पाचव्या दिवसाच्या सुरुवातीलाही इंग्लंडचे पारडे जड मानले जात होते. परंतु, तेज गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने हा सामना जिंकत पाच सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. या सामन्यानंतर भारताच्या विजयाइतकीच दोन संघांत झालेल्या शाब्दिक चकमकीची चर्चा रंगली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने भारताच्या जसप्रीत बुमराहच्या हेल्मेटला लक्ष्य करत सतत बाऊंसर टाकले. त्यानंतर बुमराहची इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि जिमी अँडरसन यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. तसेच यष्टीरक्षक जॉस बटलरही बुमराहला काही गोष्टी बोलला. हे लक्षात ठेवून भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळी त्यांच्या खेळाडूंना प्रत्युत्तर दिले.
तळाच्या फलंदाजांना लक्ष्य केले
कोहली कोणतीही गोष्ट विसरत नसून त्याच्या सहकाऱ्यांना डिवचल्यास तो प्रत्युत्तर देतोच, असे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसार म्हणाला. भारताच्या दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावरील फलंदाजांना लक्ष्य करण्याची कल्पना इंग्लंडचे प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनी असणार याची मला खात्री आहे. भारतीय खेळाडूही शांत बसले नाही. तुम्ही आमच्या एकाही खेळाडूशी पंगा घेतलात, तर आम्ही सगळे मिळून उत्तर देऊ, असेच जणू भारताने ठरवले होते. विराट कोहली कशाप्रकारे विचार करतो हे बहुधा त्यांना ठाऊक नव्हते, असे पनेसारने एका मुलाखतीत सांगितले.
कोणालाही माफ करत नाही
कोहली कोणतीही गोष्ट विसरत नाही. तो कोणालाही माफ करत नाही. तो कायम त्याच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो. प्रतिस्पर्धी संघाने त्याच्या सहकाऱ्यांना डिवचल्यास तो प्रत्युत्तर देतोच. इंग्लंडने या सगळ्याची सुरुवात केली आणि कोहलीला श्रेय दिले पाहिजे. तो मागे हटला नाही. इंग्लंडने भारताला कमी लेखण्याची चूक केली. हीच गोष्ट त्यांना महागात पडली. तुम्ही कोहलीसोबत आणि त्याच्या संघासोबत पंगा घेऊ शकत नाही, असेही पनेसार म्हणाला.
हेही वाचा – Test Rankings : लॉर्ड्सवरील दमदार कामगिरीचा सिराजला फायदा