नवी दिल्ली : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास आणि स्वीटी बुरा यांनी महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. नीतू घंघासने 5-0 सामना जिंकला, तर स्वीटी बुराने 3-2 ने विजयी झाली.
नीतू घंघास हिने 48 किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुटसेखर अलतेंगसेंग 5-0 ने हिचा दारुण पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. याआधी शनिवारी नीतूने कझाकिस्तानच्या बॉक्सरचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. गतवर्षी उपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडलेल्या नीतूने यावेळी सुवर्णपदक जिंकण्यासाठी अंतिम सामन्यात दमदार सुरुवात केली. दोन वेळची आशियाई चॅम्पियन अल्टारसेटसेगने दुसऱ्या फेरीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण नीतूने तिला कोणतीही संधी दिली नाही आणि सुवर्णपदक जिंकले.
#WATCH | “When I started boxing I faced a lot of financial problems. I felt that I won’t be able to do it, but then I improved. I’ll continue my preparation & will improve. We’ve been getting a lot of support”: Nitu Ghanghas who won Gold Medal at Women Boxing Championship pic.twitter.com/kasiZc3IK8
— ANI (@ANI) March 25, 2023
नीतू घंघासशिवाय स्वीटी बुरानेही 81 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. तिने चीनच्या लीना वँगचा 4-3 ने पराभव केला आहे. पहिल्या फेरीत स्वीटी बुरा आणि लीना वँग या दोघी लवकर गुण मिळवण्याच्या उद्देशाने एकमेकांना धक्का देण्याचा प्रयत्न करत होत्या. पहिल्या फेरीत बुराला गुण मिळाले. याचा फायदा उठवत तिने दुसऱ्या फेरीत वर्चस्व गाजवले. तिने वँग लीनावर अनेक पंचेसचा वर्षाव केला. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये 3-2 पुढे गेल्यानंतर स्वीटी बुराने मागे हटले नाही. तिने तिसर्या फेरीतही आक्रमक पध्दत सुरू ठेवली. अंतिम फेरी संपताच 30 वर्षीय स्वीटी बुराने सुवर्णपदक मिळवले.
रविवारी दोन सुवर्णपदकाची शक्यता
निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन यांनीही महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामनयात धडक मारली आहे. रविवारी (26 मार्च) बॉक्सिंग मॅटवर या दोघी उतरणार असून यांच्याकडून भारतीयांना सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या चार महिला बॉक्सरनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामध्ये नीतू घंगास आणि स्वीटी बूरा या दोघींनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले, तर उद्या निखत जरीन आणि लवलीना बोरहेगन रिंगमध्ये उतरणार आहेत. या दोन्ही सामन्याकडे भारतीय क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.