भारतीय संघाने मागील महिन्यात ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. अॅडलेड येथे झालेला या मालिकेतील पहिला कसोटी सामना भारताने गमावला. या सामन्यात भारताचा दुसरा डाव केवळ ३६ धावांत गारद झाला होता. त्यातच या सामन्यानंतर भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने भारताचे नेतृत्व केले. रहाणेच्या नेतृत्वात भारताने तीन पैकी दोन कसोटी सामने जिंकत ही मालिका जिंकली. या मालिकेच्या अखेरच्या तीन कसोटीत रहाणे भारताचे कर्णधारपद भूषवणार हे आधीच ठरले होते. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने रहाणेला फोन करून काही गोष्टी सांगितल्या.
नेट्समध्ये फार फलंदाजी टाळ
राहुल भाईने (द्रविड) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी मला फोन केला. त्यावेळी आम्ही दुबईहून ऑस्ट्रेलियाला रवाना होत होतो. ‘तू पहिल्या कसोटीनंतर भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याचे मला ठाऊक आहे. मात्र, कर्णधारपदाचा जास्त ताण घेऊ नकोस. मानसिकदृष्टया कणखर राहा. नेट्समध्ये फार फलंदाजी करणे टाळ,’ असा सल्ला राहुल भाईने मला दिला. त्याने असा सल्ला मला याआधी कधीही दिला नव्हता, असे रहाणे म्हणाला.
मेलबर्न कसोटीत शतक
राहुल भाईला फलंदाजी करायला खूप आवडते. त्यामुळे तो असा सल्ला देईल अशी मला अपेक्षा नव्हती. मात्र, त्याच्या मते मी चांगली फलंदाजी करत होतो. त्यामुळे मी फार दबाव घेऊ नये असे त्याला वाटत होते, असेही रहाणेने सांगितले. रहाणेने या मालिकेत मेलबर्न येथे झालेल्या कसोटी सामन्यात शतक केले होते. त्याच्या शतकामुळे भारताने हा सामना जिंकला होता.
हेही वाचा – इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंचे मत