भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार असून या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारताने रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल या तीन अनुभवी सलामीवीरांची संघात निवड केली आहे. या तिघांनीही मागील काही काळात चांगली कामगिरी केल्याने कोणत्या दोन फलंदाजांना सलामीला खेळवायचे हा भारतापुढे प्रश्न आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मणने या प्रश्नाचे उत्तर सुचवले आहे. त्याच्या मते रोहित आणि राहुल यांनी सलामीवीर म्हणून खेळले पाहिजे. यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० मालिकेला रोहित मुकला होता. त्याच्या अनुपस्थितीत धवन आणि राहुल यांनी सलामीवीराची भूमिका बजावली होती. मात्र, आता धवनला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे लक्ष्मणला वाटते.
रोहित, राहुलला पसंती
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे तो सलामीला खेळणार यात शंका नाही. आता दुसऱ्या सलामीवीराच्या स्थानासाठी राहुल आणि धवन यांच्यात स्पर्धा आहे. मागील काही वर्षांत भारतीय संघ व्यवस्थापनाने राहुलला पसंती दिली आहे आणि त्यानेही सलामीला खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे रोहितसोबत सलामीला येण्यासाठी मीसुद्धा राहुलची निवड करेन, असे लक्ष्मण म्हणाला.
धवनची अप्रतिम कामगिरी पण…
धवनने आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना शतकेही केली होती. तसेच त्याने नुकत्याच झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेतही शतक केले. मात्र, माझी पसंती राहुलला असेल. रोहित किंवा राहुलला दुखापत झाली, तर त्यांची जागा घेण्यासाठी भारताकडे धवनसारखा अनुभवी पर्याय आहे, असेही लक्ष्मणने सांगितले.