भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत रोहित शर्माच्या साथीने भारताच्या डावाची सुरुवात कोण करणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहलीने आता या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. पहिल्या सामन्यात तरी रोहितच्या साथीने डावखुरा शिखर धवन सलामीला येणार असल्याचे कोहलीने स्पष्ट केले. दुसऱ्या सलामीवीराच्या स्थानासाठी धवन आणि लोकेश राहुल यांच्यात स्पर्धा होती. मात्र, राहुलने मागील काही एकदिवसीय सामन्यांत मधल्या फळीत खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे धवनच रोहितच्या साथीने सलामीला खेळेल.
दोघांच्याही स्थानाला धोका नाही
धवनला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाली. मात्र, असे असले तरी तो एकदिवसीय संघाचा प्रमुख सदस्य असल्याचे कोहली म्हणाला. ‘शिखर आणि रोहित पहिल्या सामन्यात सलामीला येतील. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शिखर आणि रोहित ही आमची प्रमुख सलामीची जोडी आहे. मागील काही वर्षांत या दोघांनी मिळून अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे या दोघांच्याही एकदिवसीय संघातील स्थानाला धोका नाही,’ असे कोहली पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी
रोहित भारताचा उपकर्णधार आणि प्रमुख सलामीवीर आहे. त्यामुळे त्याचे भारतीय संघातील स्थान पक्के आहे. मात्र, त्याचा साथीदार धवनचे स्थान धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, धवनच्या एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरीत सातत्य आहे. त्याने मागील पाच पैकी तीन सामन्यांत अर्धशतके केली आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध त्यालाच संधी मिळणार आहे.