भारताच्या नेमबाजांकडून यंदा दमदार कामगिरीसह पदकांची अपेक्षा केली जात आहे. परंतु, भारताच्या नेमबाजांसाठी टोकियो ऑलिम्पिकचा पहिला दिवस विसरण्याजोगाच ठरला. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारात सौरभ चौधरीला अंतिम फेरीत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर अभिषेक वर्मा अंतिम फेरीही गाठू शकला नाही. तसेच महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात एलावेनिल वालारिवान आणि अपूर्वी चंडेला यांचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले.
A 7️⃣th place finish for India’s Saurabh Chaudhary in the 10m Air Pistol Men’s Final at #Tokyo2020.
Well done, youngster! 👏#UnitedByEmotion | #StrongerTogether | @SChaudhary2002 pic.twitter.com/hBRc6cngR4
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) July 24, 2021
युवा नेमबाज सौरभ चौधरीला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याला ५८६ गुणांसह पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवण्यात यश आले होते. त्यामुळे त्याच्याकडून असलेल्या पदकाच्या अपेक्षा अधिकच वाढल्या. परंतु, अंतिम फेरीत १३७.४ गुणांसह त्याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या गटात सर्बियाच्या दमिर मिकेकने २३७.९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले.
महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात एलावेनिल वालारिवान आणि अपूर्वी चंडेला यांचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. वालारिवान आणि चंडेला पात्रता फेरीत अनुक्रमे १६ आणि ३६ व्या स्थानी राहिल्या. या गटात चीनच्या क्वीआन वांगने सुवर्णपदकाची कमाई केली.