भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूसाठी टोकियो ऑलिम्पिक खास ठरले. सिंधूने या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्याआधी २०१६ साली रिओमध्ये ऑलिम्पिक पदार्पणात सिंधूने रौप्यपदक जिंकले होते. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंनी सोमवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनी भारतीय खेळाडूंना नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी मोदींनी सिंधूला दिलेले एक वचनही पूर्ण केले. भारतीय खेळाडू ऑलिम्पिकसाठी टोकियोला रवाना होण्यापूर्वी मोदी यांनी सिंधूला एकत्र आईसक्रीम खाण्याचे वचन दिले होते आणि ते त्यांनी सोमवारी पूर्ण केले.
मोदींनी साधला होता संवाद
मोदी यांनी जुलैमध्ये भारतीय खेळाडूंशी संवाद साधला होता. सिंधूला रिओ ऑलिम्पिकपूर्वी आईसक्रीम खाण्यास मनाई करण्यात आली होती. यंदाही तू ऑलिम्पिकपूर्वी आईसक्रीम खाऊ शकत नाहीस का? असे मोदी यांनी सिंधूला विचारले होते. त्यावेळी ‘ऑलिम्पिकसाठी तयारी करत असल्याने मला विशेष डाएट पाळावे लागत आहे. मी फार आईसक्रीम खाऊ शकत नाही,’ असे सिंधू म्हणाली होती. त्यामुळे मोदींनी ऑलिम्पिकनंतर सिंधूला एकत्र आईसक्रीम खाण्याचे वचन दिले होते.
.@Pvsindhu1 with the promised icecream by PM Shri Narendra Modi! pic.twitter.com/pUzShoDxv2
— Mann Ki Baat Updates मन की बात अपडेट्स (@mannkibaat) August 16, 2021
मोदींनी केलेले सिंधूचे अभिनंदन
सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले. तिच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत तिचे कौतुक केले होते. ‘सिंधूच्या उत्कृष्ट कामगिरीचा आम्हा सर्वांनाच खूप आनंद आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल सिंधूचे अभिनंदन. सिंधू ही भारताचा गौरव असून आपल्या सर्वोत्तम ऑलिम्पियन्सपैकी एक आहे,’ असे पंतप्रधान मोदी त्यावेळी म्हणाले होते.
हेही वाचा – भारताच्या ऑलिम्पिक पथकासोबत पंतप्रधान मोदींचा ब्रेकफास्ट