कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नळाद्वारे मुबलक पिण्यायोग्य पाणी मिळावे, यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत ५६ गावांतील पाणी योजनांचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला. याबरोबरच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन यांसह घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प यांचाही अशा एकूण ६५ कोटी रुपयांचा विकासकामांचा यावेळी शुभारंभ करण्यात आला.
कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने गेल्या काही महिन्यांपासून या योजनेसाठी पाठपुरावा सुरू होता. या योजनेमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील ५१ हजार कुटुंबांना नळजोडणी देण्यात येणार असून यामुळे त्यांना नियमित स्वरूपात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. मतदारसंघासाठी हा सुवर्ण क्षण असल्याची भावना यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली. याबरोबरच अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे १२ कोटी रुपयांच्या निधीतून काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. याचेही यावेळी नेवाळी नाका येथे भूमिपूजन पार पडले.
ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असलेल्या मलंगगड भागात पाणी पोहोचवण्यासाठी लाखो रुपयांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून घेतली आहे. या मोहिमेचा पुढचा भाग कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांकडे पाहिले जात होते. पाणी योजनांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून निधी मिळण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. याच पाठपुराव्याला यश मिळाले असून मतदार संघातील ५६ गावातील जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ६५ कोटी रुपये निधीतून येत्या वर्षभराच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार असून कल्याण आणि अंबरनाथ या ग्रामीण भागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचवणे आहे. यातून सुमारे ५१ हजार कुटुंबांना नळ जोडणी द्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अंतर्गत प्रत्येक घराला ५५ लिटर प्रति माणसी नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळणार आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी ७२६.१३ कोटी रुपयांचा आरखडा तयार करण्यात आला आहे. या शुभारंभ सोहळ्यात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना थेट कामाचे कार्यादेश देण्यात आले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार गणपत गायकवाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेनेचे महेश पाटील, राजेश मोरे, राजेंद्र चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पाणीपुरवठा विभागाचे विविध अधिकारी समवेत ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
या गावांना होणार फायदा
या योजनेचा अंबरनाथ तालुक्यातील पोसरी – पाली, पोसरी – शेलारपाडा, नेवाळी नाका, चिंचवली, काकडवाल, मांगरुळ, खरड, ढोके,आंबिवली, कुशिवली यांच्यासह विविध गावांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. या बरोबर कल्याण तालुक्यातील मौजे पिंपरी, पिंपरी कर्मंनगरी, खोणी वडवली, म्हारळ, वरप, कांबा, वाकळन, नारीवली, शिरढोण यांसह विविध गावांचा यात समावेश आहे. अंबरनाथ तालुक्यातील श्रीमलंगगड पर्यटनस्थळ क्षेत्राचा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने विकास होत असून श्रीमलंगगड क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्याचे १२ कोटी खर्च करून काँक्रिटीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे भूमिपूजन नेवाळी नाका डोंबिवली बदलापूर महामार्ग येथे शनिवारी खासदार डॉ. शिंदे यांच्या हस्ते पार पडला. रस्ते कामाच्या कॉंक्रिटीकरणामुळे गडाकडे येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.
माझ्यासाठी आनंदाचा क्षण – डॉ. श्रीकांत शिंदे
कल्याण लोकसभा मतदारसंघातील श्रीमलंगगड आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांची पाणी मिळविण्यासाठी वणवण होते असे. उन्हाळ्याच्या काळात येथील नागरिकांची खास करून महिलांची पाण्याअभावी मोठी वणवण होत असे. या नागरिकांना पाणी दिलासा मिळावा यासाठी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. याच मेहनतीला यश मिळाले याचा आनंद होत आहे.